नवी दिल्ली / वृत्तसंस्था
महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या चार कसोटी क्रिकेटच्या नव्या संकल्पनेला कडाडून विरोध केला आहे. चार दिवसांच्या कसोटी मुळे कसोटी क्रिकेटची खरी रंगत निघून जाईल, अशी भीती सचिनला वाटते. पाचव्या दिवशी जलद गोलंदाज, फिरकी गोलंदाज भेदक मारा करू शकतात, ही बाब चार दिवसांच्या कसोटीमुळे कालबाह्य होईल, असे सचिन म्हणतो
आयसीसी सध्या 143 वर्षांचा इतिहास असलेल्या पाच दिवसीय कसोटी क्रिकेट प्रकाराला बदल करण्याच्या विचारात आहे. कसोटी क्रिकेट सामना पाचऐवजी चार दिवसांचा खेळला जावा यावर ते विचाराधीन आहेत. मात्र, यापूर्वी विराट कोहली रिकी पॉटिंग, जस्टीन लँगर, नॅथन लियॉन यांनीही या प्रस्तावाला विरोध केला आहे.
‘मी स्वतः नेहमी कसोटी क्रिकेटला प्राधान्य देत आलो आहे. पाच दिवसांचे क्रिकेट हेच अभिजात कसोटी क्रिकेट आहे. त्यामुळे सध्याच्या रचनेत बदल केला जाऊ नये, असे सचिन म्हणतो. कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱया दिवशी तिसऱया दिवशी फलंदाजी करणे अनेक संघांना मानवते. किंबहुना त्यांचा खेळ कसोटीत अधिक बहरतो. पण पाचव्या दिवशी खेळच होणार नसेल तर खेळाची नजाकत निघून जाईल’, अशी भीती इथे सचिनने व्यक्त केली.
‘आयसीसीला कसोटी पाचऐवजी चार दिवसांची का करायची आहे, हे आपण समजू शकतो. चाहत्यांना कसोटीकडे वळायला लावणे, हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. पण, कसोटी सामने उत्तम व्हायचे असतील तर उत्तम खेळपट्टी असायला हवी आणि जर खेळपट्टी उत्तम असेल तर कसोटी सामने कंटाळवाणे होणार नाहीत. कसोटीला पर्याय म्हणून वनडे आले, वनडेला पर्याय म्हणून टी-20 क्रिकेट आले आता टीö10 क्रिकेटचे युग येते आहे. या पार्श्वभूमीवर, कसोटी क्रिकेटच्या अभिजात रचनेला धक्का लावला जाऊ नये असे सचिनला वाटते.