प्रतिनिधी/ काणकोण
कोरोना महामारीचे संकट असूनही काणकोण तालुक्यातील गणेशभक्त गणेश चतुर्थी सणाच्या तयारीला लागले असताना मागच्या तीन दिवसांपासून सतत पडणाऱया पावसामुळे या उत्साहावर विरजण पडल्यागत झाले आहे. तरी देखील माटोळीचे साहित्य आणि खाद्यपदार्थांची एकत्रित सोय व्हावी यासाठी ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहाय्याने काणकोणच्या स्वयंसेवी संघटनानी एकत्र येऊन काणकोण पालिकेजवळ माटोळी साहित्याचा बाजार भरविला आहे.
गणपतीला आवडणाऱया सर्व रानटी वनस्पती आणि फळांबरोबरच चिबूड, काकडी, दोडकी, भेंडी, निरफणस, वांगी, कोकणदुधी, तोरांद, चिकूसारखी फळे, माटोळी बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱया केवणीच्या काठय़ा, दोरा, केळीची पाने या बाजारात विक्रीला ठेवण्यात आली आहेत. पावसाची तमा न बाळगता विक्रेते या बाजारात व्यवहार करत आहेत. या वस्तूंचा दर किंचित जादा असताना देखील गणेशभक्त पडेल त्या किमतीने वर्षाला एकदाच होणाऱया या उत्सवासाठी या वस्तू खरेदी करत असल्याचे दिसत आहे.
या वस्तूंशिवाय तयार खाद्यपदार्थ, थर्माकॉलचे मंडप या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेले असून दोन दिवसांचा हा बाजार आहे. गावडोंगरी, खोतीगाव, श्रीस्थळ या भागांतील आदिवासी लोकांनी मागच्या कित्येक वर्षांपासून ही परंपरा टिकवून ठेवली आहे. त्यामुळे प्रत्येकाला जंगलात जाऊन माटोळीचे साहित्य गोळा करण्याचे श्रम आता पडत नाहीत, अशी प्रतिक्रिया दिवाकर भगत यांनी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.
गणेश चतुर्थीच्या सणाची कित्येक दिवसांपासून वाट पाहणाऱया आणि फटाके व अन्य आतषबाजीचे साहित्य, विविध प्रकारचे रंगीबेरंगी हार त्याचप्रमाणे अन्य साहित्याची विक्री करणाऱया व्यापाऱयांना मात्र मागच्या वर्षापासून कोरोनाची झळ बसलेली आहे. यंदा पावसाने त्यात भर घातलेली आहे. या उत्सवासाठी कित्येक जण बँकांकडून कर्ज घेऊन, तर काही जण उधारीवर माल घेत असतात. यापूर्वी या तालुक्यात कित्येक ठिकाणी पाच, सात दिवसांचा उत्सव साजरा केला जायचा. सार्वजनिक गणेशोत्सव 9 ते 11 दिवसांपर्यंत असायचा. त्यावेळी या व्यापाऱयांची बऱयापैकी कमाई व्हायची. त्या कमाईवर मागच्या वर्षापासून परिणाम झालेला आहे. दरवर्षीचा उत्साहच मावळला आहे, अशा प्रतिक्रिया काही स्थानिक व्यापाऱयांनी या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केल्या.