ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात तर चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने 4 लाखांचा टप्पा पार केला. कालच्या दिवसात 9 हजार 211 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 298 जणांचा मृत्य झाला. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4 लाख 651 इतकी झाली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
बुधवारी नोंद झालेल्या 298 मृत्यूंपैकी 60 मृत्यू हे एकट्या मुंबईतील आहेत. सध्या राज्यात मृत्युदर 3.61 टक्के आहे. तर राज्यात आतापर्यंत 14463 जणांनी आपला जीव गमावला आहे. सद्य स्थितीत एकूण 1 लाख 46 हजार 129 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच, दिलासादायक बाब म्हणजे बुधवारी एकूण 7 हजार 478 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 59.84 टक्के एवढं आहे. राज्यभरात आतापर्यंत 2 लाख 39 हजार 755 लोकं कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 20 लाख 16 हजार 234 नमुन्यांपैकी 19.87 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8 लाख 88 हजार 623 लोक होम क्वारंनटाइन मध्ये आहेत तर 40 हजार 777 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.