प्रतिनिधी/ चिपळूण
तालुक्यात नुकत्याच झालेल्या महापूर व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील सुमारे 80 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यानुसार आतापर्यंत 810 कोटी 50 लाख 38 हजार 545 रूपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित 20 टक्के पंचनामे शिल्लक असल्याने नुकसानीचा आकडा हजार कोटीचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज आहे. मात्र तातडीने मदत वाटप करण्याची विविध मंत्र्यांची आश्वासने मात्र हवेत विरल्याचे चित्र आहे. अनुदानाचीही अद्याप प्रतीक्षाच आहे. अनुदानाअभावी मदत वाटप रखडले असून सध्या पूरग्रस्तांना धान्य वाटप सुरू आहे, लवकरच डाळ व रॉकेल दिले जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी आलेल्या महापुरामुळे शहरासह खेर्डी, कळंबस्ते, वालोपे, मजरेकाशी, मिरजोळी आदी गावांत मोठी हानी झाली आहे. शहरात साफसफाई करण्याबरोबरच कोकण आयुक्त व्ही. बी. पाटील, जिल्हाधिकारी बी. एन. पाटील, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, निवासी नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरू आहे. यासाठी अधिकारी व कर्मचाऱयांची 45 पथके तैनात करण्यात आली आहेत.
आतापर्यंत 18 हजार 104 पंचनामे पूर्ण झाले आहेत. आतापर्यंत 80 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यानुसार येथे 872 घरांचे अंशतः, 32 घरांचे पूर्णतः, 214 गोठे, 7 हजार 744 भांडी, 7 हजार 768 अन्नधान्य, 4 हजार 137 दुकाने, 221 सार्वजनिक मालमत्ता, 4 हजार 394 वाहने, हजारो जनावरे आदी प्रकारचे 810 कोटी 50 लाख 38 हजार 545 रूपयांचे नुकसान झाले आहे. पंचनाम्यांचे आणखी 20 टक्के काम बाकी असल्याने नुकसानीचा आकडा हजार कोटीवर जाणार आहे.
एकीकडे नुकसानीचा आकडा हजार कोटीकडे असताना दुसरीकडे शासनाच्या मदतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुनर्वसन व मदतकार्य मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तातडीने मदत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शुक्रवारपासून मदत दिली जाणार होती. मात्र अद्याप शासन स्तरावरून अनुदानच आले नसल्याने हे वाटप रखडले आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांची घोषणा हवेतच विरल्याचे दिसून येत आहे. सध्या पूरग्रस्तांना पंचनामा यादीनुसार 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू रास्त धान्य दुकानांमधून दिला जात असून लवकरच 5 किलो डाळ व 5 लिटर रॉकेल दिले जाणार आहे.