नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बिहारमधील दिवंगत दलित नेते आणि लोकजनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग हे 5 जुलैपासून बिहारमध्ये ‘आशीर्वाद यात्रा‘ आयोजित करणार आहेत, असे त्यांच्या पक्षाच्या वतीने घोषित करण्यात आले आहे. लोकजनशक्ती पक्षात नुकतीच फूट पडली असून चिराग पासवान यांची फुटीर गटाकडून अध्यक्षपदावरून हाकालपट्टी करण्यात आली आहे पासवान यांनीही बंड केलेल्या 5 खासदारांना पक्षातून काढून टाकलेले आहे. त्यामुळे कोणता गट खरा लोकजनशक्ती पक्ष आहे, याचा निर्णय आता निवडणूक आयोगाला करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर ही आशीर्वाद यात्रा होत आहे. या पक्षाचे लोकसभेत 6 खासदार असून त्यातील पाच फुटले आहेत. फुटीर गटाचे नेते पशुपती कुमार पारस यांनी या यात्रा कार्यक्रमावर टीका केली असून पासवान यांच्या बैठकीला जमलेले लोक ‘भाडोत्री’ असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. रामविल्नास पासवान यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी चिराग पासवान यांनी बोलाविलेल्या बैठकीत करण्यात आल्याचेही सांगण्यात आले होते.