भारतीय सैन्यही ऍक्शन मोडमध्ये
वृत्तसंस्था/ बीजिंग
लडाखमध्ये सुरू असलेला सीमावाद सोडविण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू असताना चीनने सीमेवर सैनिकांची जुळवाजुळव वाढविली आहे. याचमुळे भारतालाही मिरर डिप्लॉयमेंट पॉलिसीच्या अंतर्गत 50 हजार सैनिकांना तैनात करावे लागले आहे. भारत-चीन सीमेवर सैनिकांची ही तैनात पाहता दशकातील हा सर्वात मोठा सैन्य तणाव असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील वर्षी जून महिन्यात गलवान येथील हिंसेनंतर दोन्ही देशांचे पूर्ण तयारीनिशी सीमेवर ठाण मांडून आहे.
चीनने गलवान हिंसेदरम्यान तैनात सैनिकांच्या संख्येहून 15 हजार अधिक सैनिकांना यंदा तैनात केले आहे. भारतीय गुप्तचर आणि सैन्य अधिकाऱयांनुसार चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने मागील काही महिन्यांमध्ये हळूहळू स्वतःच्या सैन्याची उपस्थिती वाढवून 50 हजारांहून अधिक केली आहे.
दोन्ही देशांनी तणावादरम्यान सीमावर्ती भागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत. यात हिवाळय़ादरम्यान सैनिकांना राहण्यासाठी इन्सुलेटेड केबिन्स आणि टेंट सामील आहे. भारत आणि चीन सैन्याने यातील बहुतांश निर्मितीकार्ये पूर्व लडाखमध्ये केली आहेत. येथे गोगरा-हॉटस्प्रिंग, डेपसांग आणि डोकलाममध्ये भारत आणि चीनचे सैन्य अद्याप आमने-सामने तैनात आहे.
शस्त्रास्त्रही तैनात
चीनच्या संशयास्पद हालचाली पाहून भारतानेही सीमेवर नवनवी शस्त्रास्त्रs तैनात करण्यास प्रारंभ केला आहे. भारतीय सैन्याने लडाखच्या उंचीवरील भागांमध्ये चीनला तोंड देण्यासाठी के-9 वज्र हॉवित्झर तोफांना तैनात केले आहे. याचबरोब टी-90 भीष्म, पिनाका रॉकेट, राफेल, अपाचे, चिनूक यासारख्या घातक शस्त्रास्त्रांनाही सीमा क्षेत्रात ठेवण्यात आले आहे. भारतीय सैन्याकडून रशियाकडून निर्मिती लाइटवेट स्प्रूट-एसडी रणगाडा खरेदी करण्याचा विचारही सुरू आहे. इस्रायलकडून खरेदी करण्यात आलेला टीपी ड्रोनही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून नियंत्रण रेषेपर्यंतच्या देखरेखीसाठी तैनात केला जाणार आहे.
‘ऑफेन्सिव्ह डिफेन्स’ व्यूहनीति
भारताने चीनच्या विरोधात ऑफेन्सिव्ह डिफेन्स व्यूहनीति स्वीकारली आहे. याचमुळे लडाखमध्ये भारताने सैनिक आणि शस्त्रास्त्रांना मोठय़ा प्रमाणावर तैनात केले आहे. भारताने पूर्वी सीमेवर चिनी अतिक्रमण रोखण्यासाठी सैनिक तैनात केले होते. पण आता सामर्थ्यात मोठी वाढ करून प्रत्युत्तरादाखल हल्ला करणे आणि चिनी सीमेत प्रवेश करण्याची क्षमताही प्राप्त केली आहे.