तिबेटी युवकांची पत्रकार परिषेदत मागणी : बंगळूर ते दिल्ली रॅली दरम्यान गोव्यात दाखल
प्रतिनिधी /पणजी
बिजींग चीन येथे 2022 साली होणाऱया शीतकालीन ऑलिंपिकवर भारतासह जगातील सर्व राष्ट्रांनी बहिष्कार घालावा. तिबेटला चीनपासून मुक्ती देण्यास चीनवर दबाव आणावा, अशी मागणी बेंगळूरमध्ये राहात असलेल्या तिबेटी युवकांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.
तिबेटमधील अत्याचारावर जगाचे लक्ष वेधण्यासाठी तिबेटी युवकांनी बेंगळूर ते दिल्ली मोटरसायकल रॅली काढली असून सोमवारी गोव्यात पोहोचल्यावर त्यांनी पणजीत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी तिबेटवर होणार अन्यायावरील माहिती दिली. भारताने तिबेटीयांना आश्रय दिला तसेच प्रत्येकवेळी तिबेटची बाजू उचलून धरली. त्यासाठी भारताची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही रॅली आहे. चीनच्या कोठडीत अनेक तिबेटी राजनैतिक कैदी कैद आहेत त्यांना मुक्त करावे, आंदोलनात सहभागी झालेल्या 167 आंदोलकांनी स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली. त्यांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ नये व तिबेटला परत एकदा स्वतंत्र राष्ट्र म्हणून दर्जा मिळेपर्यंत लढत राहाण्याचा संदेश देण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आल्याचे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेवेळी भारत तिबेट संयोग मंचचे लालजी पागी, के. के. चर्तुवेदी, अध्यक्ष सेरींग कोंपेल, तेंनझींग दोंडेन व तेंझीन लाक्षी हजर होते.