ऑनलाईन टीम / टोकियो :
चीनमध्ये असणाऱ्या 57 जपानी कंपन्यांना पुन्हा मायदेशी आणण्याचा निर्णय जपानने घेतला आहे. यासाठी लागणारा खर्चही जपान सरकारने करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे चीनला मोठा झटका बसला आहे. काही दिवसांपूर्वीच भारत, अमेरिका आणि तैवानने चीनसोबतचे व्यावसायिक संबंध तोडले आहेत. त्यामुळे चीनला बसलेला हा चौथा सर्वात मोठा झटका आहे.
चीनवरील निर्भरता कमी करण्यासाठी जपानने हा निर्णय घेतला आहे. जपानच्या या निर्णयामुळे चीनला हजारो कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. जपानी कंपन्या मायदेशी परत आल्यास त्यांना आवश्यक असणारे सर्व सहकार्य सरकारमार्फत केले जाणार आहे. जपानी कंपन्यांच्या पुरवठा साखळीवर काहीही परिणाम होऊ नये आणि त्या मुख्यपणे चीनवर अवलंबून राहू नयेत, हा यामागचा उद्देश आहे.
पूर्व लडाखमधील भारत-चीन हिंसक संघर्षांनंतर भारताने चीनच्या 59 ॲप्स वर बंदी आणली. भारताच्या या पहिल्या दणक्यानंतर अमेरिका आणि तैवानेही चीनसोबत असलेले संबंध संपवले. आता जपाननेेही चीनसोबतचे व्यावसायिक संबंध संपवण्याचा निर्णय घेतला आहे. जपानने चीनमधील सर्व 57 जपानी कंपन्यांना मायदेशात येऊन उत्पादन घेण्यासाठी आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने 54 कोटी डॉलर्सचा निधी जाहीर केला आहे. सरकार सर्व जपानी कंपन्यांना मायदेशात परत आणण्यासाठी एकूण 70 अरब येन खर्च करणार आहे.