फारुख अब्दुल्ला यांचा दावा : 370 चा मुद्दा चीनकडूनच उपस्थित
वृत्तसंस्था/ श्रीनगर
नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि श्रीनगरचे खासदार डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी कलम 370 ला चीनशी जोडल्याने वाद निर्माण झाला आहे. कलम 370 चा मुद्दा चीन स्वतःच उपस्थित करत असून यात मी बोलण्याची गरज नसल्याचे स्पष्टीकरण अब्दुल्ला यांनी एका मुलाखतीत दिले आहे.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री अब्दुल्ला हे स्वतःच्या विधानांमुळे चर्चेत असतात. परंतु चीनच्या मदतीने कलम 370 पुन्हा लागू करण्यासंबंधीचे त्यांचे विधान अत्यंत वादग्रस्त ठरले आहे. विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
देशाचे नुकसान इच्छितात लोक
काही लोकांना कुठलीच गोष्ट योग्य वाटत नाही. अशाप्रकारचे लोक देशाचे नुकसान घडवून आणू इच्छितात, अशी संतप्त प्रतिक्रिया फारुख यांनी वादाप्रकरणी केले आहे. अब्दुल्ला यांच्या कलम 370 संबंधी विधानावर मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. भाजपने अब्दुल्ला यांच्यावर जोरदार टीका चालविली आहे. अब्दुल्ला यांचे विधान देशविरोधी असल्याची टिप्पणी जम्मू-काश्मीर भाजप अध्यक्ष रविंद्र रैना यांनी केली आहे.
चर्चा आवश्यक
भारत आणि चीन यांच्यातील तणाव चर्चेतूनच दूर होऊ शकतो. युद्ध यावर उपाय ठरू शकत नाही. युद्धाने यापूर्वी कधी कुठला प्रश्न सुटलेला नाही आणि भविष्यातही सुटणार नाही. दोन्ही देशांना चर्चा करावी लागणार आहे. सध्या सुरू असलेल्या दोन्ही देशांमधील सैन्यस्तरीय चर्चेने काहीच निष्पन्न होणार नाही. भारताने चीनशी थेट बोलणे गरजेचे आहे. राजनयिक स्तरावरून चर्चा व्हावी, त्यातूनच तोडगा निघू शकतो असे मत अब्दुल्ला यांनी व्यक्त केले आहे.
कलम 370 हद्दपार
मागील वर्षी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्यात आले होते. त्यानंतर फारुख अब्दुल्ला, त्यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री ओमर तसेच पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांच्यासह अनेक नेते नजरकैदेत होते. फारुख आणि ओमर हे नजरकैदेतून मुक्त झाले आहेत. परंतु मेहबूबा अद्याप नजरकैदेत आहेत.