100 टन खतांसह पोहोचली वायुदलाची विमाने
वृत्तसंस्था/ कोलंबो
चीनसोबत निकृष्ट खतांवरून सुरू असलेल्या वादादरम्यान श्रीलंकेकरता भारताने 100 टन नॅनो नायट्रोजन फर्टिलायजर पाठविले आहे. भारतीय वायुदलाच्या दोन सी-17 ग्लोबमास्टर विमानांनी 100 टन नॅनो नायट्रान फर्टिलायर श्रीलंकेत पोहोचविल्याची माहिती तेथील भारतीय दूतावासाकडून देण्यात आली आहे. श्रीलंकेत निकृष्ट चिनी खतांचे प्रकरण उघडकीस आल्यावर भारताने हे पाऊल उचलले आहे. श्रीलंकेच्या एका न्यायालयाने तपासणीत प्रदूषित आढळलेल्या सेंद्रीय खतांच्या एका खेपवरून चीनच्या कंपनीला 49 लाख डॉलर्सची न रक्कम देण्याचा आदेश दिला होता.
श्रीलंकेने मानले आभार
सी-17 विमानांचे संचालन श्रीलंकेच्या वायुदलासोबत संपर्क साधून करण्यात आले होते. भारतीय वायुदलाच्या विमानांनी त्वरित एका रात्रीत खतांचा साठा पोहोचविला आहे, यातून दोन्ही देशांमधील दृढ समन्वय दिसून येतो असे भारतीय दूतावासाकडून म्हटले गेले आहे. श्रीलंका वायुदलाचे चीफ ऑफ स्टॉफ एव्हीएम प्रसन्ना पायो यांनी भारतीय विमानाच्या चालक दलाचे स्वागत केले आहे. श्रीलंकेकडून भारतीय वायुदलाचे आभार मानण्यात आले आहे.
चीनकडून खत घेण्यास नकार
चीनच्या किंगदाओ सीविन बायोटेककडून पाठविण्यात आलेल्या सेंद्रीय खतांची एक खेप परीक्षणांमध्ये प्रदूषित आढळल्यावर त्यासाठीची रक्कम रोखण्याचा आदेश देण्यात आला होता. तर श्रीलंकेने चीनकडून पाठविण्यात आलेले खत स्वीकारण्यास नकार देण्यात आला होता. खतांची खेप श्रीलंकेने स्वतःच्या बंदरावर उतरविण्यास अनुमती दिली नव्हती. वाद उभा ठाकल्यावर किंगदाओ बंदरावरून ही खेप घेऊन येणारे जहाज सिंगापूरच्या दिशेने वळविण्यात आले होते.
चीनकडून आक्षेप
कोलंबोमधील चिनी दूतावासाने श्रीलंका सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला होता. नमुना प्रदूषित आढळल्याच्या स्थितीत दोन्ही बाजूंनी स्वीस एसजीएस ग्रुपकडून पुन्हा परीक्षण करवून घ्यावे असे चीनने म्हटले होते. याचबराबर चीनने 29 ऑक्टोबर रोजी पेमेंट न केल्याप्रकरणी श्रीलंकेच्या पीपल्स बँकेला प्रतिबंधित केले होते. पेमेंट रोखण्याच्या न्यायालयीन आदेशाचे पालन करण्याची कायद्याने सक्ती असल्याचे पीपल्स बँकेने म्हटले होते.