वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाकिस्तानशी संलग्न पश्चिम सीमेवर आजवर भारताने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र आता चीनच्या सीमेवरही अधिक दक्षता आणि लक्ष केंद्र करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मानवाधिकारांबाबतही सेना अधिक दक्ष असेल, असे नूतन लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी सांगितले. भारतीय सैन्य कोणत्याही प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यास सज्ज असल्याचे सांगून लष्कराच्या आधुनिकीकरणाला अधिक प्राधान्य देणार असल्याचे सांगून आपल्या कार्यप्रणालीबाबत संकेत दिले.
लष्करप्रमुख म्हणून प्रथमच त्यांनी युद्ध स्मारकावर जाऊन हुतात्मा जवानांप्रती आदर व्यक्त केला. त्यांनी ‘गॉर्ड ऑफ ऑनर’ स्वीकारल्यावर माध्यमांशी बोलताना आपल्या कार्यप्रणाली तसेच भावी योजनांबाबत भूमिका स्पष्ट केली. आतापर्यंत दहशतवादी कृत्यांना तोंड देण्यासाठी भारताला वारंवार पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर अधिक लक्ष द्यावे लागत होते. मात्र त्याचबरोबर आता चीनबरोबर असणाऱया उत्तर-पूर्व सीमेवरही अधिक लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. उत्तर-पूर्व भागात भारतीय लष्कर आपला प्रभाव अधिक दाखवून देण्यासाठी अग्रेसर असेल, असे नरवणे म्हणाले.
चीन सीमेवरही तोडगा निघेल
चीन सीमेवरील शांततेबाबत ते म्हणाले, चीनबरोबर भारताचा दीर्घ काळापासून सीमेबाबत वाद सुरु आहे. त्यावर अद्याप तोडगा निघाला नसला तरीही दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी व कायम राखण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न सुरु आहेत. भारत त्यात यशस्वी ठरला आहे. लवकरच चीनकडील सीमावादावर ठोस मार्ग निघालेला दिसेल, अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर चीनबाबतचा भारताचा दृष्टीकोनही स्पष्ट केला. चीनबरोबर भारताचा अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख येथे वाद होत असतो. भारतीय आणि चीन लष्कराचे जवान वारंवार आमनेसामने आल्याने तणाव निर्माण होत असतो. मात्र नरवणे यांनी यावर मार्ग काढण्याची भूमिका विषद केली आहे.
आधुनिकीकरण दीर्घकालीन प्रक्रिया
पाकव्याप्त काश्मीरबाबत ते म्हणाले, यावर राजकीय टिप्पण्णी होत असली तरीही वेळोवेळी सीमा राखण्यासाठी भारताने रणनितीमध्ये बदल केला आहे. आधुनिकीकरण ही एक दीर्घ प्रक्रिया आहे. 370 अनुछेद रद्द केल्यानंतर येथील परिस्थितीत लक्षणीय बदल झाल्याचेही ते म्हणाले. सेनेच्या आधुनिकीकरणाची प्रक्रिया ही दीर्घकालीन असते. त्या अनुसारच काम सुरु आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सीमारेषेवर शांतता आणि सुरक्षितता राखण्याबरोबरच मानवाधिकारांबाबतही सेना अधिक दक्ष असेल असेही जनरल मनोज नरवणे यांनी स्पष्ट केले.
रावत यांनी स्वीकारला सीडीएसचा पदभार
जनरल बिपिन रावत यांनी बुधवारी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचा (सरसेनापती) पदभार स्वीकारला. तिनही दलाच्यावतीने त्यांनी गार्ड ऑफ ऑनर स्वीकारल्यानंतर आपल्या सहकाऱयांसह तीनही दलांमध्ये समन्वय आणि एक टीम म्हणून काम करण्याची त्यांनी ग्वाही दिली. भारतीय सेनादले राजकारणापासून दूर असल्याचेही स्पष्ट केले.