वृत्तसंस्था / दुबई
आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीतून याआधीच बाहेर पडलेला चेन्नई सुपरकिंग्स संघ तणावमुक्त झाल्याने त्यांचे खेळाडू आता बिनधास्तपणे खेळू लागले आहेत. आणि जाता जाता अव्वल संघांना धक्का देत परतण्याचे त्यांचे धोरण आहे. याआधीच्या सामन्यात त्यांनी आरसीबीला धक्का दिला असून गुरुवारी केकेआरविरुद्धही त्याची पुनरावृत्ती करण्याचा ते प्रयत्न करतील. सामना सायंकाळी 7.30 पासून सुरू होईल.
केकेआरला प्लेऑफमधील स्थान गाठण्यासाठी उर्वरित दोन सामने जिंकण्याची गरज असून त्यांचे 12 सामन्यांतून 12 गुण झाले आहेत. चेन्नई मात्र शेवटच्या स्थानावर असून ते फक्त पत राखण्यासाठी खेळत आहेत. अनेक संघ 16 किंवा 14 गुणांवर साखळी फेरीचा टप्पा पूर्ण करण्याची शक्यता असल्याने स्पर्धेच्या या टप्प्यावर प्रत्येक संघ मोठा विजय मिळविण्याचा प्रयत्न करून रनरेट वाढविण्याचा प्रयत्न करेल. समान गुण झाल्यास प्लेऑफमधील संघ निश्चित करण्यासाठी रनरेटचा आधार घेतला जाईल. आधीच्या सामन्यात आरसीबीला चेन्नईने धक्का दिला असल्याने केकेआरसाठी हा सामना सोपा असणार नाही. फलंदाजांचा अस्थिर क्रम हा कर्णधार इयॉन मॉर्गनसाठी चिंतेचा विषय असून माजी कर्णधार दिनेश कार्तिककडून जोमदार प्रदर्शन होण्याची तो अपेक्षा करीत आहे.
दिल्लीविरुद्धच्या विजयात चमक दाखविणारा नितिश राणा पंजाबविरुद्ध मात्र पूर्ण अपयशी ठरला होता.
या मोसमात केकेआरला आघाडी फळीच्या खेळातील सातत्याचा अभाव त्यांना अडचणीचा ठरला असून क्रमवारी व खेळाडूंमध्ये वारंवार बदल करावा लागला आहे. त्यामुळे आघाडी फळीने या सामन्यात चमक दाखविल्यास केकेआरला थोडीफार आशा करता येण्यासारखी आहे. त्यांच्या गोलंदाजांनी आतापर्यंत सुरेख प्रदर्शन केले आहे. त्यात गूढ स्पिनर वरुण चक्रवर्तीने विशेष प्रभाव पाडला आहे. या कामगिरीने त्याला ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी टी-20 संघातही स्थान मिळाले आहे. चेन्नईचे फलंदाज या मोसमात अपयशीच ठरत आले आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये पहिल्यांदाच ते प्लेऑफमध्ये खेळताना दिसणार नाहीत. पण लय सापडल्यास ते कोणत्याही गोलंदाजावर हल्ला करू शकतात. केकेआरचा सर्वात महागडा खेळाडू पॅट कमिन्स लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. पण हा महत्त्वाचा सामना असल्याने त्याला सर्वोत्तम प्रदर्शन करण्याची गरज आहे. केकेआरच्या फलंदाजांना चेन्नईच्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीला सामोरे जावे लागणार असून सँटनरच्या समावेशाने चेन्नईच्या गोलंदाजीला बळकटी प्राप्त झाली आहे. त्यामुळे केकेआरला आपली कामगिरी उंचावण्याची गरज आहे. सीएसकेला मात्र या मोसमाची सांगता विजयाने करण्याची इच्छा असून तसे करताना अव्वल संघांचा खेळ बिघडवण्याचे कामही ते करणार आहेत. आधीच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने शानदार अर्धशतक झळकावत विजयात मोलाची भूमिका बजावली, याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची अपेक्षा कर्णधार धोनी त्याच्याकडून करीत आहे. सीएसकेच्या गोलंदाजांनी आरसीबीच्या फॉर्मात असलेल्या फलंदाजांना जखडून ठेवत धावांपासून रोखले होते आणि याचीच केकेआरला देखील चिंता वाटत आहे. कर्णधार मॉर्गनने आघाडीवर राहून सेनापतीत्व केले तरी इतरांकडून एकसंध कामगिरी होणेही तितकेच आवश्यक आहे.