नव्या तंत्रज्ञानाचा होतोय वापर,चाळीस दिवसांत पूर्ण होणार
प्रतिनिधी / वाळपई
गोवा व कर्नाटक राज्यांना जोडणारा चोर्ला भागातील व गोवा हद्दीमध्ये येत असलेल्या रस्त्याचे हॉटमिक्सद्वारा डांबरीकरण सुरु करण्यात आले असून ते 40 दिवसात पूर्ण होणार आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरण्यात आले असून हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर प्रवासीवर्गाला बिनधास्तपणे या मार्गावर प्रवास करता येणार आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याची पूर्णपणे वाताहत झाली होती. आता नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आल्यानंतर हा रस्ता चांगल्या प्रकारे टिकेल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पावसकर यांनी दिली आहे. डांबरीकरणाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या खास समारंभात त्यांनी त्यासंदर्भात सरकारचे धोरण स्पष्ट केले. यावेळी वाइल्डर नेस्ट आस्थापनाचे मालक कॅप्टन नितीन धोंड, केरीचे सरपंच गोविंद गावस, पंच लक्ष्मण गावस, पंचायत सभासद वासुदेव सावंत, राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रमुख अभियंता मनोहर काळे, अभियंता दिलीप, हडफडकर, सर्वानंद देसाई, रस्त्याचे कंत्राटदार भक्तीयार व इतरांची उपस्थिती होती.
डांबरीकरण 40 दिवसांत पूर्ण होणार
मंत्री पावसकर यांनी पुढे सांगितले की जवळपास दहा कोटी खर्चून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. अंदाजे 40 दिवसात पूर्ण होणार असून यासाठी नागरिक व प्रवासीवर्गाने सहकार्य करावे. येणाऱया काळात राज्यातील सर्व रस्त्यांवर चांगल्या प्रकारचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याची यंत्रणा प्रयत्न करणार आहे. या रस्त्याचा गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामीळनाडू तीलही लोकांना चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे.
यावेळी केरीचे सरपंच गोविंद गावस यांनी हा रस्ता गोव्याच्या विकासासाठी कितपत महत्त्वाचा आहे, यासंदर्भात आपले विचार व्यक्त केले. मुख्य अभियंता मनोहर काळे यांनी या रस्त्यावरून प्रवास करताना निसर्गाचा मनमुरादपणे आनंद घ्यावा, असे आवाहन केले. सर्वप्रथम श्रीफळ वाढवून या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्वानंद देसाई यांनी केले तर पंच लक्ष्मण गावस यांनी आभार मानले.
अवजड वाहनांचा डांबरीकरणावर होणार परिणाम
सध्या या रस्त्यावरुन ज्या पद्धतीने अवजड वाहतूक होत आहे ते बघितल्यास त्याचा हॉटमिक्स डांबरीकरणावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. त्याचप्रमाणे काम करणाऱया कामगारांच्या जिवाला मोठा धोका आहे. यामुळे अशा प्रकारे अवजड वाहतूक सुरू राहिल्यास रस्ता 40 दिवसात पूर्ण होणे कठीण असल्याचे कामगारवर्गाचे म्हणणे आहे. सरकारकडे अनेकवेळा विनंती करूनसुद्धा या रस्त्यावरून होणाऱया अवजड वाहतुकीवर निर्बंध आलेले नाहीत. जिल्हाधिकाऱयांनी अवजड वाहतुकीला बंदी घातली तरी त्याचे पालन पोलिसांडकून होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. केरीचे सरपंच गोविंद गावस यांनीही अशा प्रकारच्या अवजड वाहतुकीमुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट केले आहे.