चेंबर ऑफ कॉमर्सची खासदारांकडे मागणी : मार्गावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-चोर्ला मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहने चालविणेही कठीण झाले आहे. रस्ता खराब झाल्यामुळे याचा परिणाम बेळगावच्या उद्योग व व्यवसायावर होत आहे. त्यामुळे बेळगावमध्ये येणारे गोव्याचे ग्राहक दिवसेंदिवस कमी होत असून, बेळगाव-चोर्ला मार्गाचे डांबरीकरण करावे, अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजतर्फे मंगळवारी खासदार मंगला अंगडी यांच्याकडे करण्यात आली.
टिळकवाडी येथील तिसरे रेल्वे गेटनजिकच्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, हा उड्डाणपूल लवकरात लवकर खुला करावा, अशी मागणी करण्यात आली. उड्डाणपूल सुरू नसल्याने तिसरे रेल्वे गेट येथे सकाळी व संध्याकाळी प्रचंड गर्दी होत असून, याचा फटका औद्योगिक कामगारांना बसत आहे.
अशोकनगर येथील इएसआय हॉस्पिटल जीर्ण झाल्याने ते स्थलांतरीत करण्यात येणार आहे. बेळगावमध्ये उद्यमबाग, मच्छे, वाघवडे, ऑटोनगर, काकती, होनगा या परिसरात औद्योगिक वसाहत पसरली असून, कामगारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी खासदारांकडे करण्यात आली.
यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल, सेपेटरी स्वप्निल शहा, टेडिंग कमिटीचे चेअरमन संजय पोतदार, खजिनदार राजेंद्र मुतगेकर, इंडस्ट्रिजचे चेअरमन आनंद देसाई, एपीएमसी कमिटीचे चेअरमन मत्तीकोप, व्हा. चेअरमन संजीव कट्टीशेट्टी यासह इतर उपस्थित होते.