कणकुंबी येथे झालेल्या बैठकीत निर्णय : पश्चिम भाग विकास आघाडीद्वारे आंदोलनाचा इशारा : पर्यावरणप्रेमींच्या आडकाठीमुळेच रस्ताकाम थांबल्याचा ठपका
वार्ताहर /कणकुंबी
चोर्ला रस्त्याची दुर्दशा होण्यास प्रशासनच जबाबदार असून या रस्त्याच्या विकासामध्ये वेळोवेळी आडकाठी घालणारे पर्यावरणप्रेमी आणि वनखाते यांना आता अद्दल घडवण्याची वेळ आलेली आहे. या रस्त्याच्या विकासासाठी आता उग्र आणि सामूहिक आंदोलन हाती घेण्यात येणार असून राजकीय पक्ष बाजूला ठेवून, मतभेद व स्वार्थ विसरून जांबोटी कणकुंबी भागाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन किरण गावडे यांनी केले.
कणकुंबी येथील ग्रामपंचायतमध्ये झालेल्या पश्चिम भाग विकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी किरण गावडे अध्यक्षपदावरून बोलत होते. बेळगाव-चोर्ला-पणजी रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे गेला असून या रस्त्याच्या दुपदरीकरणासाठी केंद्र सरकारने 220 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात करण्यापूर्वीच पर्यावरणप्रेमी गिरीधर कुलकर्णी आणि राम कुलकर्णी यांनी पर्यावरण खात्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे रस्त्याच्या पुनर्बांधणीच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. बेळगाव-पणजी हे अंतर 40 किलोमीटरने कमी करणारा अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा रस्ता आहे. जांबोटी-कणकुंबी भागातील नागरिकांनासुद्धा रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. परंतु पर्यावरणप्रेमी गिरीधर कुलकर्णी व राम कुलकर्णी यांनी केलेल्या तक्रारीमुळे चोर्ला रस्त्याच्या विकासात अडथळा निर्माण झाला आहे. शहरात बसून या भागातील नागरिकांच्या समस्या त्यांना समजू शकत नाहीत. जांबोटी-कणकुंबी भागातील जनता कशा पद्धतीने जीवन जगत आहे. अनेक समस्यांना कशी सामोरे जात आहे, याची जाणीव त्यांना नाही. रस्ता नसेल तर गावांचा विकास होऊ शकत नाही. पर्यावरणप्रेमीपेक्षा पर्यावरणाचे रक्षण स्थानिक नागरिकांकडूनच केले जात आहे. स्थानिक नागरिकांमुळेच पर्यावरण टिकून आहे, याचे पर्यावरणप्रेमींनी भान ठेवावे.
जांबोटी भागातील ग्रामपंचायतींचे ठराव मिळवणार
जांबोटी भागातील जांबोटी, आमटे, बैलूर, कणकुंबी, गोल्याळी व पारवाड या सर्व पंचायतींचे चोर्ला रस्त्याच्या संदर्भातील ठराव जमा करून प्रशासनाला सादर करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. या भागातील ग्रा.पं.च्या सर्व सदस्यांना व सर्व जनतेला विश्वासात घेऊन आंदोलनाचा निर्णय घेणार आहे. त्यासाठी गावोगावी जाऊन जागृती करण्यात येणार आहे.
यावेळी जि. पं. माजी सदस्य जयराम देसाई म्हणाले की, जांबोटी भागातील विकासामध्ये पर्यावरणप्रेमींचा नेहमीच अडथळा होत आहे. जंगली प्राण्यांमुळे अनेक लोकांना प्राण गमवावे लागलेले आहेत. पर्यावरणप्रेमींच्या आडकाठीमुळे भागातील आमगाव, हुळंद, सडा व माणसारख्या दुर्गम खेडय़ातील रस्ते रखडलेले आहेत. अनेक योजनांसाठी निधी मंजूर होऊन देखील वनखात्याच्या व पर्यावरणप्रेमींच्या उपद्रवी कारभारमुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.
विकास आघाडीची गरज
लक्ष्मण कसार्लेकर म्हणाले की, लाईट, पाणी, रस्ता या मूलभूत समस्या आहेत. परंतु जांबोटी भागाच्या दृष्टीने नागरिकांना या सुविधा मिळणे अवघड होऊन बसले आहे. पर्यावरणप्रेमी हे केवळ शासनाकडून आपली झोळी भरून घेण्यासाठीच अशाप्रकारच्या तक्रारी करत असतात. केवळ विकासकामात आडकाठी घालणे हे त्यांचे काम आहे. या भागाच्या विकासासाठी वेळप्रसंगी कायदा हातात घ्यावा लागला तरी हरकत नाही. परंतु जनतेला त्रास करणाऱयांची आता गय केली जाणार नाही. जांबोटी-कणकुंबी भागाच्या विकासासाठी ‘पश्चिम भाग विकास आघाडी’ या नावाने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची संघटना असणे गरजेचे आहे.
जय भीम संघटनेचे अध्यक्ष राजू कांबळे यांनी सांगितले की, प्रशासनाला जागं करण्यासाठी शिष्टमंडळ तयार करून, कायदेशीर दृष्टिकोनातून आता लढावं लागणार आहे. चोर्ला रस्त्याचे भिजत पडलेलं घोंगडे आता मार्गी लावण्यासाठी व आम्हाला न्याय मिळवून घेण्यासाठी कायद्याच्या चौकटीतून आंदोलन करावे लागणार आहे. प्रत्येक पंचायतीचा ठराव घेऊन जिल्हाधिकारी व धारवाड येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयाला निवेदन द्यावे लागले तरी हरकत नाही. पण चोर्ला रस्त्याचा प्रश्न सोडवावाच लागणार आहे. जर प्रशासनाने टाळाटाळ केली तर हलतार नालाच्या पाण्याचा वापर करण्यासाठी शासनाकडून इलेक्ट्रिक अंडरग्राउंड केबल घालण्यात येत आहे. ते काम हाणून पाडले जाईल, याची प्रशासनाने नोंद घ्यावी.
रस्ताकाम न केल्यास रास्तारोको
यावेळी पारवाड ग्रा.पं. उपाध्यक्ष भिकाजी गावडे, कणकुंबी ग्रा.पं. माजी अध्यक्ष अरुण नाईक, जांबोटी ग्रा.पं.माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब कुडतुरकर, पारवाड ग्रा.पं. माजी उपाध्यक्ष संजय पाटील, तसेच कुसमळीचे युवा कार्यकर्ते विलास गायकवाड आदींनी चोर्ला रस्त्याच्या दिरंगाई संदर्भात व प्रशासनाच्या निष्काळजीपणा संदर्भात परखड विचार व्यक्त करून प्रशासनाचा निषेध नोंदवला. यावेळी सर्वानुमते असे ठरले की प्रशासनाने जर रस्त्याच्या पॅचवर्कचे काम हाती घेतले नाही किंवा मंजूर रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम हाती घेतले नाहीतर समस्त जनतेसह कणकुंबी येथे बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच आमगाव, हुळंद, सडा व मान या गावांचे रस्ते वनखात्याच्या विरोधामुळे विकासाविना तसेच पडलेले असून आमगाव गावाला जाण्यासाठी असलेल्या बैलहोळ नदीवर ब्रिज मंजूर झालेले असताना वनखात्याने कामाला विरोध केला आहे.
याप्रसंगी कणकुंबीचे पंच राजाराम गावडे, कंत्राटदार रमेश खानापूरी, श्रीकांत गावडे, संतोष कदम, अनंत गावडे, रवी महाजिक, दर्शन नाईक, विठ्ठल गावस, निंगाप्पा बळजी व जांबोटी कणकुंबी भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.
मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करू…
गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये या रस्त्याची गंभीर अवस्था झालेली असून जीवघेण्या खड्डय़ांमुळेच या भागातील सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच ठिकठिकाणी झालेल्या अपघातात दहा ते पंधरा लोक गंभीर जखमी होऊन कायमस्वरूपी अपंग झालेले आहेत. स्थानिक सहा जणांना जीव गमवावा लागल्याने प्रशासनावर सदोष मनुष्यधाचा गुन्हा नोंद करावा लागेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी, असा सज्जड इशारा किरण गावडे यांनी दिला आहे. सध्या रस्त्याचे दुपदरीकरण करण्यापूर्वी किमान पॅचवर्क तरी करून होणारे अपघात टाळावेत. अन्यथा होणाऱया गंभीर परिणामांना प्रशासनाला जबाबदार धरले जाईल.