अर्ज मागे घेतल्यानंतर आज चित्र होणार स्पष्ट
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील पाच पालिकांच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जांच्या छाननीनंतर एकूण 451 उमेदवार निवडणूक लढविण्यास पात्र ठरले आहेत. आज दि. 10 रोजी अर्ज मागे घेण्याचा दिवस असून त्यानंतर लगेचच उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्याद्वारे किती उमेदवार रिंगणात राहतील त्याचेही चित्र स्पष्ट होणार आहे. तसेच दोन्ही पंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी छाननीनंतर 9 उमेदवार पात्र ठरले आहेत.
दि. 23 एप्रिल रोजी म्हापसा, मडगाव, मुरगाव, सांगे आणि केपे या पाच पालिकांसाठी निवडणूक आणि सर्वण कारापूर व वेळ्ळी या दोन ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी दि. 31 मार्च ते 8 एप्रिल या दरम्यान एकूण 532 इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. काल दि. 9 रोजी सर्व अर्जांची छाननी करण्यात आली असता म्हापसासाठी 95, मडगाव 115, मुरगांव 136, सांगे 43 आणि केपेसाठी 62 उमेदवारांचा समावेश आहे.
सर्वण कारापूर व वेळ्ळी या दोन्ही पंचायतींसाठी अनुक्रमे 5 व 4 असे एकूण 9 उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यात सर्वण पंचायतीसाठी अजास खान, भालचंद्र बाक्रे, प्रेमानंद सावंत, राजेश नाईक व सिद्धेश तारी तर वेळ्ळी पंचायतीसाठी ऑल्विटो फर्नांडीस, जेम्स फर्नांडीस, शॅनी परेरा व सायमन फर्नांडीस यांचा समावेश आहे. आज दि. 10 रोजी अर्ज मागे घेण्यात येतील व लगेचच अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. त्यानंतरचे दिवस प्रचारासाठी असतील व दि. 23 रोजी निवडणूक होईल. दि. 26 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येतील.