28, 29 रोजी यात्रा सिंधुदुर्गात : यात्राप्रमुख प्रमोद जठार यांची माहिती : 29 रोजी सावंतवाडीत समारोप
प्रतिनिधी / कणकवली:
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 पासून रत्नागिरी शहरातून पुढे सुरू होणार आहे. सायंकाळी 5 वा. यात्रा खारेपाटण येथे येईल. 28 व 29 रोजी यात्रा सिंधुदुर्गमध्ये असून 29 रोजी सायंकाळी सावंतवाडी येथे समारोप होईल. नारायण राणेंचा हा दौरा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आहे. छत्रपती संभाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. मी संभाजी महाराजांना पकडलेल्या प्रसंगाची आठवण करून दिली. ठाकरे सरकारची व औरंगजेबाच्या मोगलाईशी तुलना केली. राणेंना अटक करून शिवसेनेने स्वत:च्या पायावर दगड मारून घेतला आहे. शिवसेनेला कोकणच नव्हे, तर महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असे जनआशीर्वाद यात्रेचे संयोजक, माजी आमदार प्रमोद जठार येथे बोलताना म्हणाले.
येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जठार बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष कानडे, सभापती मनोज रावराणे, उपाध्यक्ष सोनू सावंत, सुशिल सावंत, बबलू सावंत उपस्थित होते.
जठार म्हणाले, राणे 39 वर्षे शिवसेनेत होते, त्यामुळे ठाकरी भाषेत बोलले. शिवसेनेची दसरा मेळाव्याची भाषणं काढली, तर 100 केसेस होतील. ठाकरी भाषेचा उगम तुमच्याकडून आहे. आमची जनआशीर्वाद यात्रा ही विकासाचा बॅकलॉग भरण्यासाठी आहे. दोन वर्षांत कोकणला विकासाबाबत न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर सात वर्षांत घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही यात्रा काढली आहे. राम मंदिर, जनधन योजना, काश्मीर प्रश्न व अन्य कामे लोकांपर्यंत जाऊन सांगणार. या यात्रेच्या माध्यमातून राहिलेल्या कामांबाबत आश्वासित करण्याच्या अनुषंगाने जनतेच्या गाठीभेटी व आशीर्वाद घेण्यात येत आहेत. यात्रेत केंद्रीय मंत्री राणेंकडे अनेक समस्या जनतेने मांडल्या आहेत.
हिंदूधर्म रक्षक संभाजी महाराजांना दगा फटका होऊन मुघल खानाने पकडले. त्या प्रसंगाची आठवण आली. नारायण राणेही छत्रपती संभाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी जात असताना अडवलं. इतिहास तुम्हाला माफ करणार नाही. पोलिसांना मी सांगत होतो, नोटीस द्या, अटकेला आम्ही विरोध करत नाही. स्थानिक पोलीस अधीक्षक निर्दयीपणे, मोगलाई पद्धतीने वागत होते. त्या वागण्यातून औरंगजेबही लाजला असेल, असेही जठार म्हणाले.
केंद्रीयमंत्री राणे रत्नागिरी जिल्हय़ात आहेत. हे लक्षात घेऊन राणेंसोबत अधिकारी जाऊ नयेत, यासाठी पालकमंत्री अनिल परब यांनी जिल्हा नियोजन बैठक घेतली. त्यात त्यांचा व्हीडिओ आला आहे. त्यांची सीबीआय चौकशीची मागणी आम्ही केली आहे, असे जठार म्हणाले.
सद्यस्थितीत व्यापारी त्रस्त आहेत, लसीकरणाची गरज, उद्योगधंदे बंद आहेत, या साऱयाचा आढावा घेऊन राणे हे मोदींना अहवाल सादर करणार आहेत. त्यांच्याकडे उद्योग खातं असल्याने ते फिरत आहेत. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक सहकार्य करतील, अशी अपेक्षा आहे. चुकीचे काम भाजप करणार नाही, असेही जठार म्हणाले.
बालबुद्धीच्या आमदारांकडून टीका!
आमदार राजन साळवी व वैभव नाईक यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत अवमान केल्याच्या केलेल्या तक्रारीबाबत जठार म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांची तुलना कोणाशी होऊच शकत नाही. आमदार डॉ. साळवींनी कुठल्या तरी विषयात डॉक्टरेट मिळविली, असे वाटले होते. मात्र, दक्षिण पॅसिफक महासागरातील टोंगा बेटावरील देशाकडून त्यांना ते सन्मानपूर्वक मिळाल्याचे समजले. त्यांची बालबुद्धी आहे. आमदार नाईक यांचा इतिहास बदललाय आणि भूगोल बिघडलाय, असे सांगतानाच, मी न केलेल्या गुन्हय़ाबाबत मी फाशीही जायला तयार आहे. गुन्हा दाखल करायचा असेल, तर ठाकरे सरकारवर करा, संजय राऊत यांच्यावर करा, असेही जठार म्हणाले.
‘बाहुबली’चा गेम केला!
शिवसेना मराठा आरक्षणाविरोधात आहे, अशी टीका करतानाच रत्नागिरीत अनिल परब यांचा माईक सुरू असताना दोन बाजूला बसलेल्या ‘कटाप्पां’नी या ‘बाहुबली’चा गेम केला. एकाला रत्नागिरीचे पालकमंत्रीपद हवे होते, पण सिंधुदुर्गचे मिळाले. दुसरा निवडून येऊनही पालकमंत्री म्हणून मुंबईतून आणून बसवला. त्यांना विकासाबाबत काही देणे-घेणे नाही. त्यांच्याकडून विकासाची अपेक्षाही नसल्याचे जठार म्हणाले.