ऑनलाईन टीम / मुंबई :
पूरपरिस्थितीवरून विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप करत शिवसेनेकडून करण्यात आला आहे. शिवसेनेच्या या आरोपाला केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे. या संदर्भात नारायण राणे यांनी एक ट्विट करत सेनेवर हल्ला चढविला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून दैनिक सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांवर टीका करण्यात आली आहे. त्याला उत्तर देताना राणे म्हणाले की, जनता आता समोर येऊन राग व्यक्त करू लागल्यामुळे शिवसेना हादरून गेली आहे. त्यामुळेच सामनामध्ये एकाच विषयावर लागोपाठ दोन दिवस अग्रलेखातून जळफळाट झाला. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणे आणि लोकहीत जोपासणे याचा शिवसेनेशी कोणताही संबंध राहिलेला नाही हेच यावरून सिध्द होते. असे त्यांनी ट्विट केले आहे.
पुढे ते म्हणाले, लोकांच्या संकटाचे राजकारण आम्ही करत नाही. मोटार चालविण्याचे कौतुकही करून घेत नाही. अशा प्रसंगी तळी उचलण्याची सवयच असलेल्याना तळी उचलू द्या आम्ही लोकांची सेवा करू, असा टोला देखील राणे यांनी लगावला आहे.
शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून विरोधकांवर टीका करण्यात आली आहे. विरोधकांचा पूरग्रस्त भागाचा दौरा म्हणजे राजकीय पर्यटन असल्याची टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील दुर्घटनाग्रस्त भागांत राजकीय पर्यटन सुरू झाले आहे. ते थांबले तर मदत आणि पुनर्वसन कार्यास अधिक गती येईल. महाड, चिपळूणला सर्वात जास्त फटका बसला.
तळीये गावातील दुर्घटना भयंकर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात बसून सरकारी यंत्रणेस कामाला जुंपत असतानाच तिकडे विधान परिषदेचे ‘वि. प. ने.’ दरेकर व माजी मंत्री महाजन हे धावाधाव करीत महाडला पोहोचायचा प्रयत्न करू लागले. शेवटी पाण्याच्या प्रवाहात त्यांना गटांगळ्या खाव्या लागल्या व सरकारी यंत्रणेस होडय़ा वगैरे घेऊन त्यांना वाचवावे लागले, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.