प्रतिनिधी / सातारा :
प्रतिवर्षी पशुविभागातर्फे जनावरांचे लसीकरण करण्यात येते. विशेष म्हणजे पावसाळ्यात जनावरांची अधिक काळजी घेणे गरजेचे असते. सध्या कोरोनाचा संसर्ग जरी वाढत असला तरी शासनाने अत्यावश्यक सेवेमध्ये पशुवैद्यकीय सेवांचा समावेश केला आहे. याच अनुशंगाने पशुविभातर्फे जिल्हय़ात पशुलसीकरण मोहिम कोरोना काळातही अविरतपणे सुरू आहे. प्रतिवर्षी पावसाळयापूर्वीपर्यंत (मे महिना अखेर) हे लसीकरण पुर्ण होते. यंदा मात्र कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे या लसीकरण शिबिराला ही विलंब झाला. यंदा हे लसीकरण मे अखेरीस सुरू करण्यात आले असुन, आता जुलै अखेर पर्यंत संपणार आहे.
प्रत्येक गावोगावी पशुविभागातर्फे संपर्क साधुन, दवंडी पिटवून या लसीकरणाबात नागरिकांना जागृती करण्यात आली आहे.सध्या मोठी जनावरे गाय, बैल यांना घटसर्फ, फऱ्या आणि शेळ्या- मेंढ्या यांना आंतरविषार हे तीन लसीकरण संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. जिल्हय़ातील जनावरांच्या आकडेवारीनुसार शेळ्या 3 लाख 45 हजार 338, मेंढ्या 1 लाख 79 हजार 721, गाय-बैल 3 लाख 47 हजार 846 व म्हैस 3 लाख 23 हजार 553 इतके आहेत. जिल्ह्यात एकुण 12 लाख पशुधन लस उपलब्ध झाली आहे. सध्या एकुण 11 लाख 96 हजार 458 जनावरांची नोंद आहे.