नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी कोरोना लसीवरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ‘जबाबदार कोण?’ असं म्हणत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की, आता लसीवर फक्त मोदीजींचा फोटो आहे, उर्वरित जबाबदारी राज्यांवर टाकली गेली आहे. राज्यांचे मुख्यमंत्री केंद्र सरकारकडे लसीच्या कमतरतेबद्दल माहिती पाठवत आहेत. आज भारताच्या 130 कोटी लोकसंख्येपैकी केवळ 11% लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे आणि केवळ 3 % टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. मोदीजींच्या लस उत्सवाच्या घोषणेनंतर गेल्या एका महिन्यात लसीकरण 83% घटले. आज मोदी सरकारने देशाला लसीच्या कमतरतेच्या दलदलीत ढकलले आहे. सरकारचे अयशस्वी लस धोरण या लसीच्या कमतरतेमागे असल्याचे दिसून येते. याला जबाबदार कोण?, असा सवाल प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला आहे.
कोरोनाच्या सुरवातीपासूनच कोरोना लस सर्वसामान्यांचे जीवन वाचविण्याच्या साधनाऐवजी पंतप्रधानांच्या वैयक्तिक प्रसिद्धीचे साधन बनले. त्यामुळे जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आज इतर देशांच्या लशीच्या देणग्यांवर अवलंबून आहे. तेसच लसीकरणाच्या बाबतीत जगातील कमकुवत देशांच्या रांगेत सामील झाला आहे, असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.
प्रियांका गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना विचारलेले तीन प्रश्न
1.सरकारची गेल्या वर्षी लसीकरणाची संपूर्ण योजना तयार होती, मग जानेवारी 2021 मध्ये केवळ 1 कोटी 60 लाख लसी का मागवल्या गेल्या?
- सरकारने देशात कमी लसी देऊन परदेशात अधिक लसी का पाठवल्या?
- जगातील सर्वात मोठा लस उत्पादक भारत आज इतर देशांकडून लस मागवण्याच्या स्थितीत का आहे आणि हे सरकार उपलब्ध असल्यासारखं भासवण्याचा प्रयत्न का करत आहे?