जम्मू-काश्मीर/प्रतिनिधी
पंजाबनंतर काँग्रेसला जम्मू-काश्मीरमध्ये मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्या गटाशी निगडीत पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मीर यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप लावले आहेत. त्यांनी आपल्या राजीनाम्यात लिहलंय की, मीर यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस सातत्याने पिछाडीवर जात आहे. त्यांच्या दुर्लक्ष करण्यामुळे याआधीच अनेक काँग्रेस नेत्यांनी राजीनामा दिला होता. राजीनामा देणाऱ्यांमध्ये चार माजी मंत्री आणि तीन आमदारांचा देखील समावेश आहे.
जम्मू काश्मीर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी आणि माजी मंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष मीर यांच्यावर दुर्लक्षित करण्याचा आरोप लावत आपल्या पदाचा संयुक्त रित्या राजीनामा दिला आहे. त्यांनी आमच्या म्हणण्याकडे लक्षच दिलं जात नसल्याचा ठपका या नेत्यांनी ठेवला आहे. या राजीनाम्यात म्हटलंय की, गुलाम अहमद मीर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस अत्यंत दयनीय अवस्थेकडे निघाली आहे. आतापर्यंत 200 पेक्षा अधिक काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश केला आहे.