32 जवानांनी पत्करले हौतात्म्य : गृह मंत्रालयाकडून माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटना आणि घुसखोरीच्या मुद्दय़ावर गृह मंत्रालयाने राज्यसभेत माहिती दिली आहे. मागील एक वर्षात सर्वाधिक दहशतवादी घटना काश्मीरमध्ये झाल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात 37 दहशतवादाशी संबंधित घटना घडल्या. तर ऑगस्ट महिन्यात हे प्रमाण 36 राहिल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. तर चालू वर्षात आतापर्यंत 165 दहशतवाद्यांना यमसदनी पाठविण्यात आले.
एकूण दहशतवादी घटनांमध्ये 2018 पासून सातत्याने घट होत आहे. 2018 मध्ये एकूण दहशतवादी घटनांची संख्या 417 होती. 2019 मध्ये हा आकडा 255 तर 2020 मध्ये 244 आणि चालू वर्षात ऑक्टोबरपर्यंत 200 पर्यंत कमी झाला आहे.
याचबरोबर सीमेवरील घुसखोरीचे प्रकारही कमी झाले आहेत. 2018 मध्ये 143, 2019 मध्ये 141 आणि 2021 मध्ये घुसखोरीच्या 51 घटन घडल्या . तर चालू वर्षात आतापर्यंत घुसखोरीच्या 51 घटना निदर्शनास आल्या आहेत.
चालू वर्षात सैन्य आणि निमलष्करी दलाचे 32 जवान हुतात्मा झाले. तर जम्मू-काश्मीर पोलीस विभागाच्या 19 जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी मोहिमांमध्ये आतापर्यंत 165 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.