ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 24 जून रोजी जम्मू-काश्मीरच्या नेत्यांशी होणाऱ्या बैठकीपूर्वी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करा, अशी मागणी केली आहे. जम्मू-काश्मीरचा पूर्ण राज्याचा दर्जा पूर्ववत झाला पाहिजे. त्यात कोणतीही शंका किंवा संदिग्धता नसावी, अशी भूमिका काँग्रेस पक्ष सुरुवातीपासूनच घेत असल्याचे चिदंबरम यांनी आज सांगितले.
चिदंबरम म्हणाले, जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा पूर्ववत करावा आणि संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात आक्षेपार्ह कायदे रद्द केले पाहिजेत. तसेच पूर्वीच्या यथास्थितीमध्ये पुनर्स्थापित केले पाहिजेत.
रविवारी काँग्रेस पक्षाने पुन्हा जुनी भूमिका घेतली आणि कलम 370 पुन्हा लागू करण्याची मागणी केली. त्यानंतर आज काँग्रेस नेते चिदंबरम यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ‘काल काँग्रेस पक्षाने पुन्हा जुनी भूमिका घेत जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 लागू करण्याची मागणी केली. जम्मू-काश्मीरचा पूर्ण राज्याचा दर्जा पूर्ववत झाला पाहिजे. त्यात कोणतीही शंका किंवा संदिग्धता नसावी’