ऑनलाईन टीम / जळगाव :
मुंबई एनसीबीच्या पथकाने जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे 1500 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
एनसीबीच्या पथकाला खबऱ्याकडून टीप मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे एका संशयित ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये 1500 किलो गांजा आढळला. हा गांजा आंध्रप्रदेशच्या विखाशापट्टणम येथून विक्रीसाठी महाराष्ट्रात आणण्यात आला होता. पोलिसांनी हा गांजा जप्त करुन दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे.
अमली पदार्थ विरोधी मोहिमेने राज्यात जोर धरला आहे. मुंबई पोलिसांनी चार दिवसांपूर्वीच एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्याकडील 2.14 किलो अमली पदार्थ जप्त केले होते. त्याची किंमत जवळपास 6 कोटी रुपये होती.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच श्रीनगरमधून 24 किलो चरस आणून मुंबईला पुरवणाऱया टोळीला पोलिसांनी अटक केली होती. या टोळीकडून पोलिसांनी 24 किलो चरस जप्त केला. ज्याची किंमत जवळपास 14 कोटी 40 हजार आहे.