पाटण –
आरक्षणसंबंधी संयुक्त जनता दलाचे प्रवक्ते अजय आलोक यांच्या विधानावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाच स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. आरक्षणाचा लाभ मिळालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांनाही हे लाभ मिळत रहावेत. हे लाभ रोखण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्टीकरण नितीश यांनी दिले आहे. यापूर्वी आलोक यांनी ट्विट करत कुटुंबात एका सदस्याला आरक्षणाचा लाभ मिळाल्यावर त्यानंतर हे सत्र बंद व्हावे असे मत व्यक्त केले होते. तर नितीश कुमार यांनी जातीच्या आधारावर जनगणनेची मागणी पुन्हा केली आहे. आर्थिक आधारावरही आता आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. आरक्षणाच्या तरतुदीत आता कुठलाच बदल होणार आहे. राज्यात मागासवर्ग आणि अतिमागास वर्गाला जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या काळापासूनच आरक्षण मिळत आहे. कुणालाच यापासून वंचित ठेवता येणार नसल्याचे नितीश म्हणाले. विधानसभेत वारंवार प्रस्ताव संमत करून आम्ही जातीय जनगणनेची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. स्वातंत्र्यापूर्वीच ही जनगणना बंद झाली आहे. जातीय जनगणना झाल्यास अचूक माहिती मिळणार आहे. कुठल्या जातीचे किती लोक आहेत, त्यांच्यासाठी काय करावे हे निश्चित करणे सोपे ठरणार असल्याचे विधान नितीश यांनी केले आहे.