प्रतिनिधी /बेळगाव
जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव या सेवाभावी संघटनेचा 35 वा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. अध्यक्ष संजय पाटील, विशेष समिती सदस्य मोहन कारेकर, विभागीय संचालक मदन बामणे, फेडरेशन संचालक शिवराज पाटील, सचिव विजय बनसूर, माजी अध्यक्ष सुनील भोसले, अनंत लाड, डॉ. विनोद गायकवाड, अशोक हलगेकर, उमेश पाटील या माजी अध्यक्षांच्या हस्ते केक कापण्यात आला.
मोहन कारेकर यांनी 35 वर्षांत अनेक चढउतार पाहिल्याचे सांगितले. सामाजिक जाणीव ठेवून कार्य करणाऱया आपल्यासारख्या सदस्यांमुळे जायंट्स मेन ही संघटना पाय रोवून घट्ट आहे, असे संचालक शिवराज पाटील यांनी सांगितले.
मदन बामणे म्हणाले, सर्वच आजी-माजी अध्यक्ष व सदस्यांनी ही संघटना टिकवून ठेवली. बेळगाव शहर आणि परिसरात जायंट्स मेनने नावलौकिक मिळवला असून यापुढेही निःस्वार्थ भावनेने असेच कार्य करत राहून सुवर्णमहोत्सव साजरा करूया. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष शिवकुमार हिरेमठ, सुनील मुतगेकर, खजिनदार लक्ष्मण शिंदे व सर्व पदाधिकारी, सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.