‘भाग्यनगर’ नावाच्या गोंधळामुळे स्वच्छ सर्वेक्षणाचे पथक बेळगावात
प्रतिनिधी / बेळगाव
केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत अभियान उपक्रमांतर्गत शहरातील स्वच्छतेच्या सर्वेक्षणास प्रारंभ करण्यात आला आहे. बेळगावचे सर्वेक्षण दि. 24 रोजी करण्यात येणार आहे. मात्र, कोप्पळ जिल्हय़ातील भाग्यनगर परिसराच्या पाहणीसाठी निघालेले अधिकारी बेळगावात पोहोचले, त्यामुळे महापालिकेने सर्व व्यवस्था केली. पण कोप्पळ जिल्हय़ातील ते भाग्यनगर असल्याची माहिती अधिकाऱयांना मिळाल्यानंतर त्यांना परत जावे लागले.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध शहरांतील स्वच्छतेचा आढावा घेणारे पथक देशभर फिरत आहे. विविध शहरांमध्ये जाऊन स्वच्छतेची माहिती घेण्यात येत आहे. स्वच्छतागृह, कचऱयाची उचल, नागरिकांच्या समस्या तसेच घरोघरी शौचालय आहे का? अशी विविध माहिती या पथकाकडून घेण्यात येते. कचऱयाची विल्हेवारी व सांडपाण्याचा निचरा कसा केला जातो याचा तपशील या सर्वेक्षणाच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत केंद्र शासनाचे पथक रविवारी सकाळी बेळगावात दाखल झाले.
भाग्यनगर परिसरातील स्वच्छतेची पाहणी करणार असल्याचे मनपा अधिकाऱयांना सांगण्यात आले. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्र शासनाचे पथक अचानक आल्याने महापालिकेच्या स्वच्छता विभागातील पर्यावरण अभियंत्यांची भंबेरी उडाली. पूर्वसूचना न देता आलेल्या पथकातील अधिकाऱयांना राहण्याची व्यवस्था तसेच आवश्यक पाठपुरावा करण्यासाठी मनपा अधिकाऱयांनी धावपळ सुरू केली.
पथक पुन्हा कोप्पळला रवाना
भाग्यनगरची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर दि. 24 फेब्रुवारी सर्वेक्षणाची वेळ देण्यात आल्याचे मनपा अभियंत्यांनी सांगितले. त्यामुळे सर्वेक्षणाचे वेळापत्रक पथकातील अधिकाऱयांनी पाहिले असता कोप्पळ जिल्हय़ातील भाग्यनगरची पाहणीची तारीख दि. 15 असल्याचे आढळून आले. त्यामुळे मनपा अभियंत्यांसह सर्वेक्षणासाठी आलेले पथक बुचकळय़ात पडले. सर्वेक्षणासाठी असलेले पथक सोमवारी सकाळी पुन्हा कोप्पळला रवाना झाले