सागर पाखरे/ पाली
रत्नागिरी जिल्हयामध्ये फलोत्पादन व रोजगार हमी योजनेतून लागवड योजना लागू झाल्यापासून मोठय़ा प्रमाणावर आंबा, काजू या खरीप हंगामातील नगदी पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे फळधारणा होणा-या या फळपिक झाडांच्या हवामानावर आधारीत विमा योजनेच्या माध्यमातून शेतक-यांना आर्थिक नुकसानीची पुर्णतः झळ बसून नुकसान होऊ नये म्हणून विम्याचा लाभ दिला जातो. यामध्ये यावर्षीच्या आंबिया हंगामामध्ये ज्या बागायतदार शेतक-यांनी फळपिक विमा काढलेला होता. त्यानुसार त्यांना विमाछत्र असणा-या कालावधीत अनेक वातावरणीय बदल, पाऊस होऊन पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले होते. त्याला आता हंगाम संपून तीन महिने झाले तरीही विमा कंपनीकडून कोणत्याही प्रकारे नुकसानीची टक्केवारी वा अन्य माहिती व विमा रक्कमेविषयी याची माहिती दिलेली नसल्याने शेतक-यांना पुढील हंगामासाठी खते , औषधे खरेदीसाठी पैशांची आवश्यकता असल्याने विमा रक्कम तातडीने मिळण्याची गरज आहे.
खरीप आंबिया हंगामातील फळपिकांसाठी हवामानावर आधारीत योजना शासनाने शेतक-यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विभागातील प्रामुख्याने आंबा, काजू या मोठय़ा प्रमाणावर लागवड केलेल्या हंगामी नगदी फळपिकांसाठी विशेषतः तयार केलेली आहे. त्यामध्ये गतवर्षी सन 2019 – 2020 या हंगामामध्ये अनेक शेतक-यांनी या अंतर्गत विमा उतरविलेला आहे. यामध्ये आंबा, काजू या फळपिकांसाठी फलधारणेच्या कालावधीत पाऊस, कमी -जास्त तापमान वेगाचे वारे, गारपीट या हवामान धोक्यापासून फळपिकांना निर्धारीत केलेल्या कालावधीत शेतक-यांना विमा संरक्षणातून आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच याव्दारे फळपिक नुकसानीच्या अंत्यत कठीण परिस्थितीत शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी आणि शेतक-यांना नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास देणे असे या योजनामागील शासनाचे उद्दिष्टय़े आहे. गतवर्षी कोकणातील रत्नागिरी विभागासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेडची अधिकृत नियुक्ती करण्यात आली होती. जिल्हयातील महसुल व कृषी मंडळांच्या कार्यक्षेत्रानुसार ही योजना राबवली गेली। गेल्या काही वर्षात शेतक-यांमध्ये हवामानामुळे उदभवणा-या धोक्यांच्यामुळे होणा-या आर्थिक नुकसानीची हानी टाळण्यासाठी विमा काढण्याकडे शेतक-यांचा कल वाढलेला आहे. परंतु गतवर्षीचा विमा अद्यापही शेतक-यांना मिळालेला नाही आहे.
यामध्ये शेतक-यांना लाभ घेणे एwच्छिक आहे. मात्र ज्या शेतक-यांनी फळपिकांसाठी कर्ज घेतले आहे. अशा सर्व शेतक-यांना ही योजना घेणे सक्तीचे असते. तसेच गारपीट या हवामान धोक्यासाठी सहभाग एwच्छिक आहे. या योजनेमध्ये शेतक-यांवर आर्थिक बोजा पडू नये म्हणून केवळ विमासरंक्षित रक्कमेच्या केवळ 5 टक्के व विमा हप्ता भरावा लागतो. उर्वरीत विमा हप्ता शासन अनुदान म्हणून शेतक-यांना देते. गतवर्षी सन 2019-2020 या हंगामामध्ये 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी या कालावधीत काजू या पिकासाठी कमी तापमानाचा निकष होता व त्या कालावधीमध्ये जानेवारी अखेरीस मोठी तापमान घट झाली होती. तसेच आंबा या पिकासाठी 1 डिसेंबर 2019 ते 15 मे 2020 या कालावधीत अवेळी पाऊसाचा निकष होता. व त्या कालावधीत मे मध्ये बहुतांश ठिकाणी अवेळी पाऊस झाला आहे. तसेच 1 जानेवारी 2020 ते 10 मार्च 2020 या कालावधीत कमी तापमानाचा निकष होता. त्या कालावधीत जानेवारी अखेरीस कमी तापमान झाले होते. तसेच 1 मार्च 2020 ते 15 मे 2020 या कालावधीत जास्त तापमानाचा निकष होता. त्यानुसार मार्च तापमानात वाढ झाली होती. या हवामानाच्या बदलामुळे आंबा, काजू या पिकांच्या फलधारणेवर व परिपक्वतेवर परिणाम होऊन उत्पादनात घट झाली त्यामुळे या हवामाना आधारित विमा योजनेच्या निकषामध्ये शेतकरी बसत आहेत.
या हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेत समाविष्ट महसुल मंडळात दोन ते तीन गावात हवामान बदलाची नोंद करणारी यंत्रणा उभारलेली असते त्यामुळे प्रत्यक्षामध्ये महसुल मंडळात साठ ते सत्तर गावे असतात तेथे अनेकदा हवामान बदल होतो परंतु यंत्रणेच्या गावात हवामान बदल झाला नसल्यास त्याची नोंद होत नाही त्यामुळे हि यंत्रणा जास्त गावात उभारणे गरजेचे आहे. त्याच बरोबर हवामान बदलामुळे होणा-या नुकसानीची टक्केवारी प्रमाण हे लगतच्या मंडळांमध्ये नुकसान सारखेच असूनही बदलेले असते त्यामुळे शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होते यंदाच्या फळपिक विमा योजनेचा 15 मे 2020 चा कालावधी संपल्यानंतर 15 दिवसात हि प्रक्रिया सुरु होणे गरजेचे होते. परंतु आता तीन महिने झाले तरी अद्यापही विमा कंपनीने विमा वाटपाच्या संदर्भात हालचाली केल्या नसल्याचे शेतक-यांनी सांगितले यंदा एकीकडे कोरोना प्रादुर्भावामुळे असणारी टाळेबंदीमुळे काजू, आंबा यांच्या बाजारपेठेतील खरेदीविक्री वर मोठे निर्बंध आले तर दुसरीकडे हवामान बदलाचा फटका यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडलेला आहे. त्यामुळे फळपिक विमा कंपनीने विमा तातडीने वितरीत करण्याची शेतक-यांनी मागणी केलेली आहे.