प्रतिनिधी/ सातारा
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून नियोजन समिती सदस्य निवडी झाल्या नव्हत्या. सोमवारी अचानक पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी निवडी जाहीर केलेल्या आहेत. या निवडीत मकरंद पाटील, दीपक चव्हाण या दोन आमदारांबरोबरच प्रभाकर देशमुख, दीपक पवार, शेखर गोरे या तीन पराभूत उमेदवारांचाही समितीवर वर्णी लागली आहे. जिल्हा समितीच्या निवडीत राष्ट्रवादीच्या वाटय़ाला 12 तर शिवसेना आणि काँग्रेसच्या वाटय़ाला प्रत्येकी चार सदस्य आले आहेत.
महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आल्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन लागला होता. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांची नियुक्ती रखडली होती. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर ज्या पक्षाचा पालकमंत्री त्या पक्षाची सदस्य संख्या जास्त असे सूत्र ठरले होते. त्यानुसार सातायात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली अन् फॉर्म्युला जसा ठरला होता तशी नावे त्या त्या पक्ष कार्यालयातून कळविली होती. प्रक्रिया पूर्ण होताच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी त्या निवडी आज जाहीर केल्या आहेत.
जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित व नामनिर्देशित सदस्यांची यादी सोमवारी जाहीर झाली. गेल्या दीड महिन्यांपासून या यादीवर मुख्यमंत्र्यांची सही कधी होणार याची उत्सुकता इच्छुकांना लागली होती. मुख्यमंत्र्यांची सही झाल्यानंतर उपसचिवांनी याबाबतचे पत्र जिल्हा नियोजन समितीचे अधिकारी बी. जे. जगदाळे यांना पाठविले आहे. यामध्ये 20 सदस्यांमध्ये संसद व विधीमंडळ सदस्यांतून नामनिर्देशित सदस्य म्हणून आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण यांचा समावेश झाला आहे.
नियोजन समितीवर सत्तेत असलेल्या पक्षांच्या सदस्यांना काम करता यावे यासाठी विशेष निमंत्रित व नामनिर्देशित सदस्यांची निवड पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने उपमुख्यमंत्री करतात. त्यानंतर अंतिम यादी मुख्यमंत्र्यांच्या सहीने प्रसिध्द केली जाते. त्यानुसार आज सातारा जिह्यातील नियोजन समितीची विशेष निमंत्रित सदस्यांची यादी जाहीर झाली. यामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना यांच्या जिह्यातील सदस्यांना या माध्यमातून नियोजन समितीवर घेतले जाते.
त्यानुसार ज्या पक्षाचा पालकमंत्री आहे. त्यांना जादा जागा दिल्या जातात. यामध्ये नामनिर्देशित सदस्यांमध्ये आमदार व खासदारांपैकी दोन सदस्य घेतले जातात. नामनिर्देशित तज्ञ सदस्य म्हणून चार व विशेष निमंत्रित 14 सदस्यांचा समावेश केला जातो. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला 12, शिवसेनेला चार व काँग्रेसला चार सदस्य वाटणीला आले आहेत. यामध्ये संसद व विधीमंडळ सदस्यांतून नामनिर्देशित सदस्य म्हणून आमदार मकरंद पाटील व दीपक चव्हाण यांच्या नावाचा समावेश केला आहे.
तसेच जिल्हा नियोजन समितीचे ज्ञान असलेले तज्ञ नामनिर्देशित सदस्य म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील माने, ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष ऍड. विजयराव कणसे, शिवसेनेतून जयवंत शेलार यांचा समावेश केला आहे.
विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये राष्ट्रवादीतून धैर्यशिल अनपट, ऍड. श्यामराव गाढवे, सतीश चव्हाण, दीपक पवार, सुरेश्चंद्र उर्फ राजभाऊ काळे, सागर साळुंखे, प्रभाकर देशमुख, संतोष पाटील. काँग्रेसमधून अशोक गोडसे, जयवंतराव जगताप, हिंदूराव पाटील, शिवसेनेतून शेखर गोरे, राजेश कुंभारदरे, राहूल बर्गे यांच्या नावाचा समावेश आहे.