प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हा कोरोना संसर्गाच्या पाशातून आताशी कुठे बाहेर पडण्याच्या मार्गावर असतानाच अस्मानी संकटाने सर्वसामान्यांचे आणि शेतकऱयांचे कंबरडे मोडले आहे. याबाबत उपाययोजना करण्यासाठी सर्वसामान्य शेतकरी आशेने प्रशासनाकडे पाहत असतानाच सातारा जिल्हा परिषदेने लाखो रुपयांची उधळपट्टी करीत अभ्यास दौरा केला आहे. या अनाठायी खर्चाविरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते आणि युवा राज्य फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना निवेदन दिले आहे.
निवेदन देताना कपिल राऊत, नंदकुमार जावळे, हणमंत शिंदे, नागेश शिंदे आदी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सातारा जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येक वर्षी विविध विभागांचे अभ्यास दौरे आयोजित केले जात होते. परंतु मागील दोन वर्षांपासून देशावर व राज्यावर कोरोना महामारीचे संकट कोसळल्यामुळे केंद्र व राज्य सरकारने असे अनाठायी होणारे खर्च थांबवून ते आरोग्यावर खर्च करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसे अध्यादेश संबंधित विभागांना पारीत केलेले आहेत. मग सातारा जिल्हा परिषद याला अपवाद कशी आहे? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. चालूवर्षी बांधकाम विभाग, समाजकल्याण विभागाने लाखो रूपये खर्च करून अभ्यास दौरे कशासाठी काढले? या दौऱयावर लाखोंचा चुराडा कशासाठी? या अभ्यास दौऱयांचा सातारकरांना फायदा किती होणार आहे? हा एक संशोधनाचा विषय आहे. असे असताना सातारा जि. प. सदस्यांचा हा चंगळवाद सातारकर कदापी सहन करणार नाहीत. त्यातच जिह्यामध्ये वादळी पावसाने हाहाकार माजविल्याने शेतकऱयांचे लाखो रूपयांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी मेताकुटीस आला आहे. या अशा आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये समाजाला व शेतकऱयांना अभ्यास दौऱयांची नव्हे तर आधाराची गरज आहे. हे सर्व प्रतिनिधी विसरून गेल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व यामध्ये म्हणजेच अभ्यास दौऱयासाठी विनाकारण खर्चाची तरतूद करणाऱया अधिकारी, कर्मचारी व प्रतिनिधी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येवून तरतूद केलेली रक्कम रद्द करण्यात यावी. जर तशी रक्कम खर्ची टाकली गेली असल्यास किंवा टुरिस्ट कंपनीस दिली गेली असल्यास ती सर्व रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी केली.