प्रतिनिधी / कणकवली:
जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या जोरदार फिल्डिंग लावली जात असतानाच आता ही निवडणूकच तीन महिने पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेसाठीची मे 2020 मध्ये होऊ घातलेली निवडणूक तीन महिने पुढे जाणार आहे. जिल्हय़ातील प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या निवडणुकाही तीन महिन्यांनी पुढे जाणार आहेत.
राज्य शासनाने काढलेल्या एका आदेशानुसार राज्यातील 31 पैकी 22 जिल्हा बँका व 21 हजार 225 प्राथमिक कृषी सहकारी संस्थांपैकी 8194 संस्थांच्या निवडणुका या जानेवारी ते जून 2020 या कालावधीत होणार होत्या. मात्र, सध्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 च्या अंमलबजावणीच्या कामासाठी विभागाचे क्षेत्रिय अधिकारी व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी समांतर पद्धतीने राबविण्यात अडचण येणार आहे. संचालक मंडळाची निवडणूक ही वैधानिक जबाबदारी असल्याने कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीस विलंब होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास योजनेचा मूळ हेतू शेतकऱयांना पुढील खरीप हंगामासाठी कर्ज घेण्यास पात्र करणे यात बाधा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका व प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या निवडणुका उच्च, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने घेण्यात येत आहेत तसेच ज्या संस्थांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे स्वीकारणे सुरू आहे, अशा वगळून इतर संस्थांसाठी हे आदेश लागू असणार आहेत. दरम्यान, या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याच्या वृत्ताला जिल्हा बँकेच्या सूत्रांकडूनही दुजोरा देण्यात आला आहे.