अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार, 9 जून 2021, सकाळी 9.45
● जिल्ह्यात 872 नवे रूग्ण ● 1986 कोरोनामुक्त ● आठ दिवसात 233 रूग्णांचा मृत्यू ● जून महिन्याची सुरूवात दिलासादायक ● 4 जून ते 7 जून कोरोनामुक्ती 205 टक्क्यांवर ● सार्वजनिक ठिकाणी नियमांची अमलबजावणी गरजेची
सातारा / प्रतिनिधी :
जून महिन्याच्या पहिल्या दिवसापासून जिल्ह्यात करोना रूग्णवाढीचा आलेख मंदावत चालला आहे. रूग्णवाढीचा आलेख मंदावत असतानाच कोरोनामुक्तीचा आलेख दिलासादायकपणे उसळी घेत आहे. गत आठ दिवसातील कोरोना रूग्णवाढ, कोरोना मुक्तीचे आकडे पाहता जिल्हा दुसरया लाटेच्या संकटातून सावरत असल्याचे समाधान आहे. दरम्यान लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सातारा, कराडसह मोठ्या बाजारपेठांमधे गर्दी वाढत असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने व स्थानिक प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे. दरम्यान बुधवारी जिल्ह्यात 872 नवी रूग्णवाढ झाली आहे. रूग्णवाढीचा वेग मंंदावत असल्याचे आजच्या आकड्यावरून स्पष्ट होत आहे.
बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्ती 205 टक्के
जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर ‘तरूण भारत’ नेहमीच बारकाईने नजर ठेवून आहे. त्यामुळे जिल्हावासियांना वास्तव परिस्थिती आणि नेमकी आकडेवारी देण्यावर भर असतो. या पार्श्वभुमीवर 4 जून 2021 ते 7 जून 2021 या कालावधीत आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे या चार दिवसात कोरोना बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्ती 205 टक्के झाली आहे. या दिवसात 11 हजार 928 कोरोनामुक्त झाले आहेत. तर 5 हजार 818 बाधित झाले आहेत. 63,530 चाचण्या झाल्या असून पॉझिटिव्हिटी रेट 9.15 टक्के आहे. यावरून कोरोनामुक्ती 205 टक्के झाली असली तरी मृत्यूदर मात्र 1.90 टक्के हा सर्वात जास्त आहे.
आठ दिवसात 18 हजार 820 कोरोनामुक्त
जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरूवातीपासून रूग्णवाढीचा आलेख वेगाने घसरला आहे. तसेच कोरोना मुक्त होण्याचा आलेख उंचावत चालला आहे. जूनच्या पहिल्या दिवशी 1775 कोरोनामुक्त झाले तर 2 जूनला रेकॉर्डब्रेक 5107 जणांनी कोरोनावर मात केली. 3 जूनला 2337 जण कोरोनामुक्त झाले. 4 जूनचा 836 कोरोनामुक्तीचा आकडा वगळता कोरोनामुक्तांची संख्या रूग्णवाढीपेक्षा जास्तच आहे. 5 जूनला 2923 कोरोना मुक्त तर 6 जूनला 1110 कोरोनामुक्त झाले. 7 जूनला 2736 जणांनी कोरोनावर मात केली. 8 जूनला 1986 कोरोनामुक्त झाले. आठ दिवसात एकूण 18,820 रूग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात कोरोनामुक्तीचा आकडा हा आलेख उंचावणारा ठरत आहे.
मे महिन्याच्या तुलनेत जूनमधे वेग मंदावतोय
एप्रिल, मे महिन्यात हाहाकार माजवणारा कोरोना रूग्णवाढीचा आकडा जून महिन्यात झपाट्याने घसरत निघाला आहे. 1 जूनला 1667 तर 2 तारखेला 1522 रूग्णवाढ झाली. 3 जूनला 1531 तर 4 जूनला 1588 रूग्णवाढ झाली. ही अल्प वाढ 5 जूनला आणखी कमी होत 1394 वर आली. 6 जूनला हा रूग्णवाढीचा आकडा दोनशेने खाली घसरत 1188 वर आला. 7 जूनला 1196 वर गेला तर 8 जूनला पहिल्यांदाच हजाराच्या खाली येत 875 वर पोहचल्याने जिल्हा दुसरया लाटेतून सावरत असल्याचे संकेत मिळाले. हे संकेत कायम ठेवण्यासाठी जिल्हावासियांनी शिथिल झालेल्या लॉकडाऊनमधे नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या आठ दिवसात 10,961 रूग्णांची वाढ झाली आहे. हीच वाढ मे महिन्याच्या पहिल्या सात दिवसात 15 हजारांच्याही पुढे होती.
मृत्यूदर रोखण्याचे आव्हान कायम
जून महिन्यात रूग्णवाढीचा आले कमी करण्यात आणि कोरोनामुक्ती वाढवण्यात यश आले आहे. हे जिल्हावासियांना धीर देणारे असले तरी मृत्यूदर अद्यापही म्हणावा तसा कमी झालेला नाही. त्यामुळे तो कमी करण्यासाठी आरोग्य व्यवस्थेला प्रयत्न करावे लागणार आहेत. या आठ दिवसात 21 ते 43 या दरम्यान कोरोना रूग्णांचे मृत्यू झाले आहेत. आठ दिवसात एकूण कोरोना रूग्णांचा मृत्यू 233 जणांना जीव गमवावा लागला आहे. मृत्यूदराचा हा आकडा तसा फारसा कमी झालेला नाही. जिल्ह्यात मृत्यूदर कमी करणे हे एकमेव आव्हाना आता आरोग्य व्यवस्थेपुढे आहे.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने 8,73,975, एकूण बाधित 1,77535, एकूण कोरोनामुक्त 1,59,980, मृत्यू 3,912, उपचारार्थ रुग्ण 13501
मंगळवारी जिल्हय़ात बाधित 872, मुक्त 1,986, बळी 25