जिल्ह्यात सहा तालुक्यांत सहा हत्तींचा वावर,आजरा, चंदगड, भुदरगड तालुक्यात नुकसान
कोल्हापूर / कृष्णात पुरेकर
जिल्ह्यात आजरा, चंदगड, भुदरगड, राधानगरी तालुक्यांत वन्य हत्तींचा उपद्रव वाढला आहे. हत्तीपासून होणारे शेतीचे नुकसान रोखण्याठी वन विभाग प्रयत्नशील आहे. सहा महिन्यांत दीड कोंटीची भरपाई शेतकऱ्यांना दिली आहे. हत्तींचा मार्ग रोखण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. शेतकऱ्यांना वाढीव भरपाई आणि हत्तींना वनात रोखण्यासाठी काही योजना प्रस्तावित आहेत, अशी माहिती कोल्हापूरचे उपवनसंरक्षक विलास काळे यांनी दिली. वन्य हत्तींकडून होणाऱया पिकांच्या भरपाईसाठी वयानुसार मदत देण्यासाठी प्रस्तावित असल्याची माहिती पाटगावचे वनाधिकारी संदीप पाटील यांनी दिली.
उपवनसंरक्षक काळे म्हणाले, आजरा तालुक्यात चार हत्तींचा कळप तर अन्य तीन तालुक्यात दोन टस्करांचा वावर आहे. हत्ती दिवसा जंगलात अन् रात्री वनक्षेत्राशेजारील शेतात येतात, वनहत्तींमुळे ऊस, भात, केळी अन् नारळ पिकांचे नुकसान वाढले आहे. त्यामुळे हत्तींना जंगलात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. कोरोनामुळे अनुदान येण्यास उशीर झाला असला तरी 6 महिन्यांत दीड कोटींचे वाटप केले आहे. सहा महिन्यांत 1 हजार 241 लाभार्थी शेतकऱ्यांचे 125 हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. त्यांना 54 हजार रूपयांची मदत दिली आहे. तसेच होणाऱया शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पाटगावचे वनाधिकारी संदीप पाटील म्हणाले, हत्तींच्या बंदोबस्तासाठी गस्ती पथके सक्रीय आहेत. हत्ती जात असलेल्या मार्गावरील गावांत दवंडी देणे, हत्तींना हुसकावण्यासाठी फटाके फोडणे, भोंगे वाजवण्याचे उपाय सुरू आहेत. हत्तींकडून शेतीचे नुकसान अधिक होते, त्या प्रमाणात भरपाई कमी मिळते. त्यामुळे पिकाच्या वयानुसार मदत देण्यात येणार आहे. ती प्रस्तावित आहे. पिकांच्या वयानुसार भरपाई दिल्यास शेतकऱ्यांसह शासनाचाही फायदा होणार आहे. पिकाचे 4 महिने, 8 महिने आणि 12 महिने अशा तीन टप्प्यांत विभागणी केली आहे. वन्य प्राण्यांकडून पिकाचे नुकसान झाल्यास पीक स्थिती पाहून लाभार्थ्यांना भरपाई मिळणार आहे. जिल्ह्यात हत्तींकडून होणारी पीक हानी टाळण्यासाठी चरखुदाई अन् कुंपणाची कामे सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
नुकसान टाळण्यासाठी वन विभाग सतर्क
सध्या भात पोटरीत, भरण्याच्या स्थितीत आहेत. ऊस तोडणीयोग्य बनला आहे. त्यामुळे हत्तींसाठी नारळ, केळीसह ऊस अन् भात खाण्यासाठी अधिक योग्य बनते. त्यामुळे त्यांचा वावर शेतीकडे वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतही असंतोष आहे. वन विभागाकडून पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे केले जात आहेत, तसेच संभाव्य नुकसान टाळण्यासाठी ग्रामस्थांना सतर्क केले जात असल्याचे वनाधिकारी संदीप पाटील यांनी स्पष्ट केले.
वन्यप्राण्यांमुळे जिल्ह्यात मार्च ते सप्टेंबर 2020 अखेर झालेले नुकसान
वनपरीक्षेत्र शेतकरी क्षेत्र गुंठे भरपाईची रक्कम
करवीर 10 113 47,100
पन्हाळा 405 2557 19,97,787
मलकापूर 3 34 20,400
पेंडाखळे 179 1981 10,14,563
गगनबावडा 70 848 4,25,056
राधानगरी 0 0 0
कडगाव 16 213 84,775
गारगोटी 5 41 11,275
आजरा 0 0 0
चंदगड 459 6191 29,08,552
पाटणे 94 498 2,45,000
एकूण 1241 12475 67,54,508