प्रतिनिधी /रत्नागिरी :
जिल्हय़ात कोरोना रूग्णसंख्येतील वेगवान वाढ सुरुच असून गुरुवारी 141 नव्या रुग्णांची वाढ झाल्याने जिह्यातील बाधीतांची एकूण संख्या 5 हजार 409 झाली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत आणखी 3 रूग्णांनी प्राण गमावल्याने कोरोना बाधीत मृतांची संख्या 156 झाली आहे. मागील 24 तासात कोरोनावर मात केलेल्या 73 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 1920 रुग्ण उपचाराखाली आहेत.
खेड तालुक्यातील 33 वर्षीय युवक व 48 वर्षीय महिलेसह दापोलीतील 59 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे खेड तालुक्यातील कोरोना बळींची संख्या 19 झाली आहे. दापोली तालुक्यातील कोरोनाचा हा 23 वा बळी ठरला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असताना मृत्यू रोखण्याचे यंत्रणेसमोरील आव्हान मात्र कायम आहे.
गुरुवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या 24 तासांत आरटीपीसीआर व ऍन्टीजेन चाचणीत असे एकूण 141 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. उपचारानंतर आणखी 73 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिह्यात कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 3 हजार 333 झाली आहे.
जिह्यात विविध ठिकाणी ग्रामस्थ व व्यवसायिकांकडून जनता कर्फ्यूचे आवाहन करून उत्स्फूर्तपणे लॉकडाऊन पाळला जात आहे. यामुळे कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी नागरिकही पुढाकार घेत असल्याचे चित्र आहे. याचवेळी फिरत्या ऍन्टीजेन तपासणीलाही नागरिक प्रतिसाद देऊ लागले आहेत. वेळीच निदान व तातडीने उपचाराच्या माध्यमातून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनही आग्रही आहे. यातून रुग्णवाढीवर वेगाने नियंत्रण मिळण्याची अपेक्षा आहे.