-‘निसर्ग’ चक्रीवादळातील नुकसानग्रस्त शाळांना हवाय निधी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जिल्हय़ातील प्राथमिक शाळा सुरू झाल्या आहेत. पण दिवाळीनंतर उर्वरित या शाळांतील वर्गही सुरू होणार असल्याने जिल्ह्य़ात मागील निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त 301 शाळांच्या दुरुस्तीसाठी 7 कोटी रुपयांची आजही प्रतीक्षा लागून राहिली आहे. दुरुस्ती न झाल्यास विद्यार्थ्यांना धोकादायक वर्गात विद्यार्थ्यांना बसण्याची वेळ येणार आहे.
निसर्ग चक्रीवादळाचा गतवर्षी जिह्यातील दापोली, मंडणगड तालुक्यांना मोठा फटका बसला होता. घरे, इमारतींची छत उद्ध्वस्त झाली. त्यात जिल्हा परिषदेच्या 200 हून अधिक शाळांचे नुकसान झाले होते. शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून काही शाळांची दुरुस्ती झाली. मात्र अजूनही मंडणगड तालुक्यातील 66 शाळांच्या दुरुस्तीसाठी 4 कोटी 27 लाखाची गरज आहे. त्यात या तालुक्यातील दहा शाळा तर पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या असून त्या नवीन बांधण्याशिवाय पर्याय नाही. 2 ते 9 लाखादरम्यान नुकसान झालेल्या शाळांची संख्या 52 आहे.
दापोली तालुक्यातील 164 शाळांच्या दुरुस्तीसाठी 2 कोटी 17 लाखांची गरज आहे. निसर्ग चक्रीवादळातील शाळांसाठी सुमारे 8 कोटीची आवश्यकता असल्याचा अहवाल जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सादर करण्यात आला. वर्षभरात त्यापैकी 1 कोटी 10 लाख रुपये शासनाकडून प्राप्त झाले होते. वितरणासाठी एका शाळेला 2 लाखाच्या मर्यादा असल्याने त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शाळांची दुरुस्ती आजही प्रतीक्षेत आहे. शासनाकडून निधी मिळत नसल्याने जिल्हा परिषदेने पूर्णतः नुकसान झालेल्या शाळांचे निर्लेखन करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन शाळा उभारण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा नियोजनकडे पाठवण्यात येणार आहे.
चौकट
@गेल्या निसर्ग चक्रीवादळात बाधित शाळा
तालुका शाळा रक्कम (रुपये)
मंडगणड 66 4 कोटी 27 लाख
दापोली 164 2 कोटी 17 लाख
खेड 19 18 लाख 80 हजार
चिपळूण 15 11 लाख 49 हजार
गुहागर 11 14 लाख
संगमेश्वर 12 4 लाख 45 हजार
रत्नागिरी 12 1 लाख 8 हजार
लांजा 1 4 लाख
राजापूर 1 30 हजार