प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून 2020-21 या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ विद्यार्थ्यांविनाच निघून गेला. मात्र, विलंबाने का होईना शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यास हिरवा कंदील दाखविण्यात आला. यामुळे एसटीएस प्रणालीनुसार बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातून एकूण 32 हजार 801 विद्यार्थ्यांनी पहिली इयत्तेत प्रवेश घेतला आहे. यामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्या तरी 6 ते 14 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्याच्या उद्दिष्टानुसार 6 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना पहिली इयत्तेत दाखल करण्यात आले आहे.
पूर्व प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेत दाखल करताना विविध शाळांची चेकलिस्ट तपासून पाहण्यापासून 10 वीपर्यंतचे शिक्षण एकाच ठिकाणी पूर्ण व्हावे या दृष्टिकोनातून पालकवर्ग शाळांची निवड करतात. मात्र, गतवर्षीच्या परीक्षा होण्यापूर्वीच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊनच्या माध्यमातून शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. यामुळे मे-जून उजाडला तरी धोका कायम असल्याने नूतन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ बारगळला. परिणामी दरवर्षीच्या शाळा प्रवेशाचा मार्ग हुकला होता. मात्र, शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया करण्यास परवानगी दिल्यानंतर पहिली प्रवेशाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार सप्टेंबर महिनाखेरपर्यंत जिल्हय़ात 32 हजार 801 विद्यार्थ्यांनी पहिलीत प्रवेश घेतला आहे.
पहिलीत दाखल विद्यार्थी शहरात अधिक
बेळगाव जिल्हय़ात सर्वाधिक विद्यार्थी बेळगाव शहरातील आहेत. इतर शैक्षणिक तालुक्यांच्या तुलनेत बेळगाव शहरात सर्वाधिक विद्यार्थी दाखल झाले आहेत. शहरात 6 हजार 551 विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतला आहे. शिक्षण विभागातर्फे प्रवेश प्रक्रियेचे चित्र स्पष्ट होत नसल्यामुळे शिवाय कोरोनाचा धोका वाढत असताना शाळेत विद्यार्थ्यांना दाखल करायचे की नाही याबाबत पालकांकडून विचार सुरू होता. मात्र, प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी देताच शाळा सुरू होईल तेव्हा होईल, मात्र पुढे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी नियमानुसार पहिलीत दाखल विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.