प्रतिनिधी/ चिपळूण
बर्ड फ्ल्यू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ात विविध प्रकारचे पक्षी मृतावस्थेत सापडले. त्यानंतर हे पक्षी उत्तरीय तपासणीसाठी चिपळूण विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेतून पुणे आणि त्यानंतर भोपाळ येथे पाठवण्यात आले. याला 15 दिवस उलटून गेले मात्र एकाही पक्षाचा तपासणी अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे पशुसंवर्धन विभागासह ज्या भागात मृत पक्षी आढळले तेथील ग्रामस्थही संभ्रमात आहेत.
बर्ड फ्ल्यू संसर्गाचा शिरकाव प्रथम दापोलीत झाला. तेथे मृत कावळे आढळून आल्यानंतर त्यांचा अहवाल तत्काळ प्राप्त झाला. या कावळय़ांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचा निष्कर्ष आल्याने जिल्ह्य़ात सर्वत्र सतर्कतेचे आवाहन करण्यात आले. दापोलीनंतर लांजा, रत्नागिरी, चिपळूण, खेड, मंडणगड, राजापूर, संगमेश्वर आणि गुहागर अशा सर्वच तालुक्यांत मृत पक्षी आढळू लागले. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने तालुकास्तरावर पथके नेमून मृत पक्षी तपासणीसाठी पाठवण्याच्ची व्यवस्था करर्यात आली आहे.
जिल्हय़ात 13 जानेवारीपासून मृत पक्षी सापडण्यास सुरूवात झाली. आतापर्यंत 36 कावळे, 2 कोकिळा, 5 कबुतरे, 3 चिमण्यांसह टिटवी, कवडा, घार, वटवाघुळ, हिरवा तांबट, घुबड, रॉबिन अशा एकूण 53 मृत पक्षांची नोंद झाली आहे. जिल्हय़ात विविधठिकाणी मृतावस्थेत सापडलेले पक्षी हे सर्रासपणे मानवी वस्तीतच आढळले होते. मृत पक्षांबाबत ग्रामस्थांतून प्रशासनाला कळवण्यात आले. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाकडून हे मृत पक्षी प्रथम चिपळुणातील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेत, तेथून उत्तरीय तपासणीसाठी पुणे-औंध येथील प्रयोगशाळेत व तेथून पुन्हा भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले.
जिल्हय़ात दापोलीतील मृत कावळय़ांचा अहवाल वगळता 53 मृत पक्षांपैकी एकाही पक्षाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. अहवालच प्राप्त नसल्याने पशुसंवर्धन विभागाकडून त्या-त्या भागात पुढील उपाययोजना थंडावल्या आहेत. पक्षी नेमके कोणत्या कारणाने मृत झाले, हेच स्पष्ट न झाल्याने ग्रामस्थही गोधळलेल्या अवस्थेत आहेत.