मच्छे, पिरनवाडी,यरगट्टी,कागवाड यांचा नगरपंचायतमध्ये समावेश झाल्याने आदेश
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यातील ग्राम पंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळी मच्छे, पिरनवाडी, यरगट्टी आणि कागवाड या ग्राम पंचायतींची निवडणूक घेण्याचा निर्णय झाला होता. या सर्व ग्राम पंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला होता. मात्र, त्याची अधिकृत घोषणा झाली नसल्याने ग्राम पंचायत निवडणूक घेण्याचे निवडणूक आयोगाने ठरविले. मात्र, राज्य सरकारने याबाबत आदेश काढून ग्राम पंचायतीची निवडणूक घेण्याचे रद्द करण्यात आले आहे.
नगरपंचायत दर्जाबाबत राज्यपालांकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याबाबत कोणालाही आक्षेप नोंदवायचे असल्यास तातडीने नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. त्यामुळे आता या चार ग्राम पंचायतींची निवडणूक रद्द झाली, त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.
ग्राम पंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर या सर्व ग्राम पंचायतींची निवडणूक घेतली जाईल, असे सांगण्यात आले होते. यापूर्वी गोकाक तालुक्मयातील अंकली, अक्कतंगेरहाळ, धुपदाळ यांनाही नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला होता. त्यांची निवडणूक घेतली जाणार नाही, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता आणखी चार ग्राम पंचायतींची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. एकूण 7 ग्राम पंचायतींची निवडणूक रद्द होणार आहे.