शिवसेनेच्या वर्षा कुडाळकर यांचा 30 विरुद्ध 19 मतांनी पराभव : संजना सावंत यांना दुसऱयांदा संधी
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
लक्षवेधी ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर सताधारी भाजपनेच बाजी मारली. भाजपच्या संजना सावंत यांनी शिवसेनेच्या उमेदवार वर्षा कुडाळकर यांचा 30 विरुद्ध 19 मतांनी पराभव करीत विजय मिळवला. शिवसेनेने अध्यक्षपदाच्या निवडीत राजकीय हवा करूनही काहीच साध्य झाले नाही. सौ. सावंत यांना दुसऱयांदा अध्यक्षपदाची संधी मिळाली. दुसऱयांदा संधी मिळणाऱया त्या पहिल्या अध्यक्ष आहेत.
जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता असली, तरी भाजपकडील नाराज सदस्यांना शिवसेनेकडे आणून सत्ता मिळवण्याच्या हालचाली शिवसेनेने सुरू केल्या होत्या. त्यामुळे खासदार नारायणे राणे यांनी सतर्क होत भाजपच्या सर्व सदस्यांची बैठक घेतली होती. कुणीही सदस्य फुटू नये, यासाठी त्यांना अज्ञात ठिकाणी नेऊन ठेवण्यात आले होते. शिवसनेनेही आपल्या सदस्यांना अज्ञात ठिकाणी ठेवले होते. त्यामुळे उत्सुकता कमालीची वाढली होती.
संजना सावंत यांचा उमेदवारी अर्ज
जि. प. अध्यक्ष निवडीत राजकीय वातावरण तापल्याने सकाळपासूनच जि. प. भवनासमोर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दुपारी बारा वाजता गटनेते रणजित देसाई, रेश्मा सावंत यांच्यासह संजना सावंत यांनी जि. प. मध्ये येऊन अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
वैभव नाईक यांच्या एन्ट्रीने वातावरण तापले
शिवसेनेकडून दुपारी पावणे एक वाजता वर्षा कुडाळकर यांचा उमेदवारी अर्ज अध्यक्षपदासाठी दाखल करण्यात आला. यावेळी शिवसेना सदस्यांसह आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर व शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. जि. प. अध्यक्ष निवडीसाठी खासदार नारायण राणे यांना ठाण मांडून राहवे लागते, हेच आमचे यश आहे. त्यांच्या सदस्यांवर त्यांचा विश्वास नसल्याचेही यातून स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया आमदार नाईक यांनी व्यक्त केली.
कडेकोट पोलीस बंदोबस्त
बहुमत नसतानाही शिवसेनेने अध्यक्ष निवडीत आव्हान दिले. त्यामुळे वातावरण तापले होते. त्यामुळे अध्यक्ष निवडीत चमत्कार होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. जि. प. भवनाचे सर्व दरवाजे दुपारनंतर बंद करण्यात आले. जि. प. मध्ये सदस्यांशिवाय कुणालाच आत जाऊ दिले जात नव्हते. नागरिकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
अखेर संजना सावंतच विजयी
अध्यक्षपदाची निवड प्रकिया दुपारी तीन वाजता जि. प. च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सुरू झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वर्षा शिंगण यांनी काम पाहिले. अर्ज छाननी होऊन व अर्ज मागे घेण्याची वेळ संपल्यावर दुपारी 3.30 वाजता निवडणूक घेण्यात आली. यावेळी संजना सावंत यांच्या बाजूने मतदान करणाऱयांना हात उंचावण्यास सांगण्यात आले असता भाजपच्या उपस्थित 30 सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. यावेळी भाजपचे सदस्य उत्तम पांढरे यांची प्रकृती ठिक नसल्याने ते अनुपस्थित होते. त्यानंतर वर्षा कुडाळकर यांना शिवसेनेच्या 19 सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. भाजप सदस्यांनी बाक वाजवून सौ. सावंत यांचे अभिनंदन केले. तर शिवसेना सदस्य सभागृहाबाहेर पडले.
आमदार नितेश राणे यांची उपस्थिती
सौ. सावंत यांचा विजय झाल्याचे जाहीर करीत निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा शिंगण यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यानंतर प्रभारी अध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनीही त्यांचे अभिनंदन केले. तर आमदार नीतेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, दत्ता सामंत, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, जि. प. माजी अध्यक्ष गोटय़ा सावंत जि. प. भवनामध्ये दाखल होत त्यांनीही सौ. सावंत यांचे अभिनंदन केले. तसेच जि. प. भवनासमोर फटाके वाजवत व ढोलताशांचा गजर करीत जल्लोष करण्यात आला.
सतीश सावंत, संजय पडते यांच्याविरोधात घोषणा
अध्यक्षपदी संजना सावंत यांची निवड होताच भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे सतीश सावंत व संजय पडते यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आता सभापती निवडीकडे लक्ष
दरम्यान, विषय समितीच्या चार सभापती पदांसाठी 26 मार्चला निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता आहे.