अध्याय बाविसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा, ईश्वरकृपेशिवाय सद्गुरु भेटत नाहीत आणि समजा सद्गुरुंची गाठ यदाकदाचित जरी पडली तरी, ईश्वरकृपेशिवाय त्यांच्यावर भक्ति जडत नाही. थोडक्मयात ईश्वरंच सद्गुरुंच्या रूपाने मार्गदर्शन करत असतात असं म्हणायला हरकत नाही. म्हणून सद्गुरु हेच ईश्वरमूर्ति होत. तात्पर्य, ईश्वराच्या अनुग्रहानेच जीव ज्ञानसंपन्न होतो. गुरुने ज्ञानाचे स्वरूप सांगितले तरी ते ईश्वराच्या कृपेशिवाय मनात ठसत नाही. म्हणून साधकाने सदैव ईश्वरस्मरण करत रहावे.
म्हणजे तो कृपावंत होऊन सद्गुरूंच्या रूपाने मार्गदर्शन करतो. मूळ तत्त्वे पंचवीस आहेत पण जीव ईश्वरापासून भिन्न असल्याने जीवाला सविसावे तत्त्व मानले आहे. जीव आणि ईश्वर भिन्न कसे ते समजाऊन सांगतो. जीवासाठी ईश्वराने नियम ठरवून दिले आहेत. ईश्वर हा जीवाचा नियामक आहे. त्यामुळे जिवाकडून जे जे बरेवाईट वर्तन होते त्यानुसार नियमाप्रमाणे ईश्वराकडून त्याचा न्याय केला जातो. जीवाला त्याच्या बऱयावाईट कृत्याने पापपुण्य भोगायला लागते. पण जीव हा त्रिगुणांच्या प्रभावाखाली असल्याने त्याला याची कल्पना नसते म्हणून जीव अज्ञानी असतो आणि ईश्वर त्याला ज्ञान देतो. जीव एकदेशीय असल्यामुळे मर्यादित आहे आणि ईश्वर सदासर्वदा सर्वव्यापक आहे. जीव हा हीन, दीन व अज्ञानी आहे तर ईश्वर सर्वसमर्थ व सर्वज्ञ आहे. जीवाला कर्माचे दृढ बंधन असते आणि ईश्वर हा कोणतेच कर्म करत नसल्याने तो कर्मातीत आहे. म्हणून जीव हा जरी ईश्वरी अंश असला तरी ईश्वराहून भिन्न असतो. आता कदाचित असे वाटेल की, कर्माचरण केले म्हणजे जीवाला ज्ञान प्राप्त होईल पण तसे कधीही होत नाही. कारण, कर्म हे निर्जीव आहे. कर्म हे निर्जीव असल्यामुळे, ते स्वतःहून काही करू शकत नाही. कर्माला चेतविणारा ईश्वर असतो. मनुष्य जे कर्म करतो ते घडवून आणणारा ईश्वर आहे म्हणजेच मनुष्य करत असलेले कर्म ईश्वराकडून ठरवून दिलले असते पण अज्ञानामुळे आपण ते स्वतः करतोय असा त्याचा समज असतो. आता ही गोष्ट स्पष्ट आहे की, जे कर्म ईश्वर आपल्याकडून करवून घेत आहे ते त्याने नेमून दिलेले असल्याने त्याचेच कर्म होय. म्हणून ते कर्म ईश्वराला अर्पण करणे हे नियमानुसारच आहे. ईश्वराने त्याच्या मर्जीनुसार आपल्याला या जगात पाठवले आहे तर त्याने घालून दिलेले नियम पाळणे हे आपले कर्तव्य होय. म्हणून कर्म जर ईश्वरार्पण केले नाही, तर त्या कर्माला न्याय कोण देणार? कर्म करण्याची प्रेरणा ईश्वर देतो आणि कर्माचे फळही तोच देतो. याकरता जीव व ईश्वर हे भिन्न भिन्न मानणेच योग्य आहे. म्हणून तत्त्वसंख्या सव्वीस मानली आहे. जेव्हा जीवात्मा त्रिगुणांच्या साम्यावस्थेत जातो त्यावेळी तो अत्यंत शुद्ध होतो आणि त्रिगुणांच्या पलीकडे असलेल्या ईश्वराशी एकरूप होतो. तसं बघितलं तर जीव हा ईश्वराचाच अंश असल्याने दोघांची ऐक्मयता सहज व स्वाभाविक आहे, यात शंकाच नाही. उद्धवा, समज तू आरशात पाहतो आहेस तर तुला त्यात तुझे प्रतिबिंब दिसते पण प्रतिबिंब दिसले म्हणून तू काही तुझी दोन रूपे कशी या प्रश्नाने गोंधळून जात नाहीस त्याप्रमाणेच जीव आणि शिव ही एकाच ईश्वराची दोन रूपे आहेत असे समज. आरशात दिसणाऱया तुझ्या प्रतिबिंबाला अविद्येने युक्त असलेला जीव म्हंटले तर ज्याचे प्रतिबिंब पडले आहे तो सदाशिव होय. ते दोघेही एकाचवेळी प्रत्यक्ष आणि प्रतिबिंब स्वरूपात दिसत असले तरी उभयतांचे ऐक्मय होणे हा जो त्यांचा मूळ स्वभावधर्म आहे तो तसाच राहतो. आपण आपल्या मनाप्रमाणे हालचाल केली की, तशीच हालचाल प्रतिबिंबही करते. थोडक्मयात प्रतिबिंबाच्या हालचालीवर आपल्या मर्जीनुसार आपले नियंत्रण असते, त्याप्रमाणे ईश्वराच्या मर्जीनुसार तो जीवावर नियंत्रण ठेवत असतो. आरशात बघितल्यावर जसे आपले रूप असते तसेच प्रतिबिंबांचेही दिसते म्हणून जीवामध्येही परिपूर्ण ईश्वरपण भरलेले असतो हे लक्षात घे.
क्रमशः