आसामला भारतापासून वेगळे करण्याचा दावा भोवला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम्ही भारतापासून आसाम राज्य वेगळे करू, असे विधान करणाऱया जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी शरजील इमामविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे.
आमच्याकडे पाच लाख नागरिक संघटित असतील तर आसामला किमान एक ते दोन महिन्यात भारतापासून वेगळे करता येईल. येथील रेल्वेसेवा ठप्प करण्यासाठी प्रयत्न करा. वेगळे आसाम ही आमची जबाबदारी आहे, असे नागरिकत्व सुधारित कायद्याविरोधात सभेतील भाषणावेळी शरजील याने म्हटले होते. या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याविरोधात भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी तक्रार दाखल केली होती. याची गंभीर दखल घेत आसामचे मंत्री हिमंत सरमा यांनी राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.