ऑनलाईन टीम / पुणे :
आपल्या साहित्यातून उपेक्षित आणि ग्रामीण जीवन मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक, ‘झुलवा’कार उत्तम बंडू तुपे यांचे आज पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. दुपारी 12 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मागील काही महिन्यापासून तुपे पक्षाघातामुळे आजारी होते. त्यांची पत्नी जिजा यांचाही काही महिन्यापूर्वीच पक्षाघातामुळे मृत्यू झाला होता. उत्तम तुपे यांनाही त्रास वाढल्यामुळे २ दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. झुलवाकार तुपे यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुले आहेत.
‘झुलवा’ या गाजलेल्या कादंबरीमुळे उत्तम बंडू तुपे उर्फ ‘आप्पा’ यांना झुलवाकार नावाने ओळखले जात होते. त्यांच्या अनेक कादंबऱ्याना पुरस्कार मिळाले. ‘आंदण’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला होता. ‘काट्यावरची पोट’ याआत्मकथेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला. झुलवा कादंबरीलाही राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. खुळी, कळा, कळाशी, नाक्षारी, भसम, चिपाड, इंजाल, झावळ, माती आणि माणसं या कादंबऱ्याही त्यांच्या विशेष गाजल्या होत्या.