सध्याचे युग इकोपेंडली (पर्यावरणस्नेही) वस्तूंचे आहे. प्लास्टीक तसेच इतर विघटन न होणाऱया पदार्थांचा वापर कमी करून नैसर्गिकरीत्या उपलब्ध साधनांपासून निर्माण केलेल्या वस्तू उपयोगात आणण्याचे प्रमाण वाढले आहे. भारताची पादत्राण राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱया उत्तर प्रदेशातील आग्रा शहरामध्ये झाडांच्या सालीपासून पादत्राणे आणि बूट, चप्पल इत्यादी बनविण्याच्या व्यवसायाने जोर धरला आहे. काही पादत्राण उत्पादकांनी अशा तऱहेची पर्यावरणस्नेही पादत्राणे बनविण्यासाठी विशेष प्रयोग करून तंत्रज्ञान विकसित केले आहे. या पादत्राणांमध्ये चामडे किंवा प्लास्टीकचा उपयोग कमीत कमी केला जातो आणि झाडांच्या सालीपासून बनलेल्या जैवविघटनकारी (बायोडिग्रेडेबल) सामग्रीचा उपयोग केला जातो. यामुळे पादत्राणांचे वजनही कमी होते. टिकाऊपणा वाढतो आणि जुनी पादत्राणे निसर्गावर भार बनून राहात नाहीत.
जैविक सामग्रीपासून ही पादत्राणे बनविली गेल्याने त्यांचे विघटनही लवकर होते आणि त्यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही. अशा तऱहेच्या पादत्राणांच्या उत्पादनाला अधिकाधिक प्रोत्साहन देण्याचे सरकारनेही मनावर घेतले असून अशा उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे. जुनी पादत्राणे बऱयाच वेळेला उघडय़ा गटारींमध्ये फेकून दिली जातात. त्यामुळे गटारी तुंबण्याच्या घटना घडून रोगराई पसरू शकते. पण या बायोडिग्रेडेबल पादत्राणांमुळे अशी कोणतीही समस्या निर्माण होत नाही.