आपल्या टीव्हीवरच्या वृत्तवाहिन्या हे आपल्या समाजातले फार मजेदार प्रकरण आहे. बातम्या मुख्य म्हणजे खऱया बातम्या-समजण्यासाठी आपण त्या बघायच्या असतात हा गैरसमज मनातून काढून टाकला तर त्या आपली धमाल करमणूक करतात. काही लोक बागेत जाऊन लाफ्टर क्लबमध्ये दहा-पंधरा मिनिटे ‘मोले घातले हसाया’ भावनेने हसून येतात. पण अस्मादिकांना त्या हसण्यापरीस टीव्हीवरच्या बातम्यांवर हसायला आवडते. विधानसभा किंवा विधान परिषदेच्या निवडणुका असतात. मराठी वृत्तवाहिनीवर ‘नाथाभाऊ, नाराज?’, नाथाभाऊंनी मनातली खदखद व्यक्त केली’, ‘नाथाभाऊंना उमेदवारी मिळणार?/त्यांचा पत्ता कापणार?’ वगैरे ब्रेकिंग न्यूज हमखास असतात. निवडणुकांचे निकाल लागले की ‘दहा ते पंधरा अपक्ष आमदार’ कोणाच्या ना कोणाच्या तरी संपर्कात नक्की असतात. एखादा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार असेल तेव्हा खगोलशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी लोक यांचा एकदा तरी परिसंवाद होतो, ज्यातून निष्पन्न काहीच होत नाही.
सगळय़ात बहार आणली ती कोरोनाने. कोरोना जीवघेणा आहे आणि वेगाने पसरतो आहे हे टीव्हीवीरांच्या लक्षात यायला वेळ लागला. कारण तो युरोपमध्ये आपली कामगिरी बजावत होता. राहुल गांधींनी त्यावर सावधगिरीचा इशारा देणारे ट्विट केले. पण राहुल गांधींच्या नावाला टीव्हीवाल्यांच्या मते पुरेसा टीआरपी नसावा. काही दिवस टीव्हीवाले अनाथच होते. काही वाहिन्यांनी अहमदाबादला ट्रंप येणार म्हणून झोपडपट्टी झाकण्यासाठी बांधल्या जाणाऱया अवाढव्य भिंतीची बातमी केली. पण ती बातमी गाजली नाही. मधल्या काळात काही दिवस सतत विरोधी पक्षनेते राजभवनवर गेल्याच्या बातम्या यायच्या. टीव्हीवाल्यांना खरा हात दिला तो कोरोनाने आणि आजवर कोरोनाने त्यांची साथ सोडली नाही. साथ सोडली नाही हे अक्षरशः खरे, कारण एका वाहिनीच्या अनेकांना कोरोनाची लागणदेखील झाली.
कोरोनावर उपाय शोधणाऱयाला मायबाप सरकारने सुरुवातीला एक लाख रुपयांचे बक्षीस लावले होते. पण नंतर सरकारनेच आर्सेनिक आल्बम आणि हायड्रोक्सीक्लोरोक्वीन ही औषधे जाहीर केली. आयुर्वेदिक औषधांचा शोध लावल्याचे किती जणांचे दावे ब्रेकिंग न्यूजमध्ये झळकले हे मोजायचेच आपण सोडून दिले आहे. असे पोकळ दावे करणारे लोक आयुर्वेदाला बदनाम करीत असतात. पण आयुर्वेदवाल्यांनाच त्याचा राग येत नसेल तर आपण चिडून काय फायदा.