व्यवसायासाठी होतोय टॅक्सींचाच वापर : आर्थिक गुजराणासाठी काडीचा आधार
प्रतिनिधी / वास्को
कोरोना संकटामुळे गंभीर आर्थिक संकटात सापडलेल्या टॅक्सी व्यावसायिकांनी आपला मोर्चा फळभाजी आणि मासे विक्रीकडे वळवला आहे. त्यासाठी आपल्या टॅक्सीनाच त्यांनी दुकान बनवलेले असून दिवसाची गुजराण करण्यासाठी दाबोळी विमानतळावरील जवळपास तीस टक्के टँक्सी व्यावसायिकांनी या विक्री व्यवसायाचा आधार घेतलेला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे मागच्या चार महिन्यांपासून दाबोळीचा विमानतळ ओस पडलेला आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभी कोरोनाची चाहुल लागताच पहिला आर्थिक फटका दाबोळी विमानतळ व या विमानतळाशी संबंधित टॅक्सी व्यावसायिक व अन्य व्यावसायिकांना बसला होता. कोरोनाच्या भीतीमुळे हवाई प्रवाशांची संख्या कमी होत गेली होती. अखेर देशी विदेशी हवाई सेवा बंदच झाली. तेव्हापासून दाबोळीचा विमानतळ ओस पडला. कोरोनासंबंधी अत्यावश्यक हवाई सेवा अधूनमधून दिसत होत्या. मात्र, प्रवासी वाहतुकीशी या सेवेचा संबंध नव्हता. त्यामुळे मागच्या चार महिन्यांपासून दाबोळी विमानतळावरील प्रमुख व्यवसाय मानला गेलेला टॅक्सी व्यवसाय पार कोसळला. मागच्या महिन्यात देशांर्तंगत हवाई सेवा काही प्रमाणात सुरू झालेली असली तरी टॅक्सी व्यवसाय अद्याप उभारी घेऊ शकलेला नाह. गोव्याचा आर्थिक कणा असलेला पर्यटन व्यवसायच कोसळल्याने टॅक्सी व्यावसायिकांना व्यवसायाची कोणतीही संधी राहिली नाही. त्यामुळे गोव्यातील हा फार मोठा व्यावसायिक वर्ग सध्या गंभीर आर्थिक चिंतेत सापडलेला आहे.
आठ दिवसांत एकच प्रवासी भाडे
मागच्या महिन्यात देशांतर्गंत प्रवासी वाहतुक सुरू झाल्याने टॅक्सी व्यावसायिकांना आशेचा किरण गवसला होता. मात्र, त्यांची पार निराशी झाली. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी दाबोळीच्या विमानतळावर दिवसा जवळपास नव्वद हवाई फेऱया असायच्या. मात्र, कोरोनाच्या भीतीची छाया पसरताच हवाई वाहतुकच बंद करण्याची पाळी हवाई उड्डाण मंत्रालयावर आली. त्यानंतर सुरू झालेल्या देशांतर्गंत सेवेलाही फारसा प्रतिसाद आजही मिळालेला नाही. दाबोळी विमानतळावर दिवसा मंगळूर, बंगळूर, म्हैसूर, दिल्ली अशा काही मार्गावरील मोजकीच विमाने उतरत आहेत. या विमानांतून किरकोळ संख्येने प्रवासी उतरत असतात. जाणारेही किरकोळच असतात. मागच्या जवळपास दीड महिन्यापासून विदेशात अडकलेल्या भारतीय प्रवाशांना घेऊन विशेष सेवेव्दारे काही विमाने येत आहेत. त्यातही शंभर दीडशे प्रवासी असतात. अशा प्रकारे दाबोळी विमानतळ नाममात्र कार्यरत असला तरी विमानतळावरील टॅक्सी व्यावसायिकांना त्यांचा लाभ होत नाही. गोव्यातील प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी खासगी वाहने उपलब्ध असतात. तसेच विदेशातून आलेल्या प्रवाशांच्या कोरंटाईन सेवेसाठी कंदबच्या बसगाडय़ा असतात. काहीच पर्याय नसलेले गोव्यातील प्रवासी टॅक्सींकडे वळतात. त्यामुळे या टॅक्सी व्यावसायिकांना आठवडय़ातून एखादेच भाडे मिळते. विमानतळावरील युनायटेड टॅक्सी युनियनकडे साडे तीनशे टॅक्सी व्यावसायिक असून त्यापैकी निम्मे टॅक्सी व्यावसायिक घरीच आहेत. अवघ्येच काही जण आठवडय़ातून एखादे भाडे मारतात असे संघटनेचे उपाध्यक्ष सुदेश नाईक यांनी सांगितले.
विम्यात सुट नाही, बँकेच्या हप्त्यांचीही चिंता
हवाई वाहतुक बंद आणि पर्यटन व्यवसाय पार कोसळल्याने टॅक्सी व्यावसायिकांची पार गोची झालेली आहे असे स्पष्ट करून गेले चार महिने व्यवसाय बंद असला तरी सरकारने वाहनांचा विमा भरण्यालाही सुट दिलेली नाही. विम्याची रक्कम हजारोंच्या घरात असल्याने सद्यस्थितीत ती भरणे कठीण आहे. विमा नसताना प्रवासी भाडय़ाच्या आशेने टॅक्सी रस्त्यावर आणणेही धोक्याचे असल्यानेही टॅक्सी व्यावसायिकांना टॅक्सी बाहेर काढण्याचे धाडस होत नाही. टँक्सींच्या बँक हप्त्यांचाही विषय सरकारने गांभिर्याने घेतलेला नाही. त्यामुळेही टॅक्सी व्यावसायिक चिंतेत सापडलेले आहेत असे नाईक यांनी सांगितले.
आर्थिक गुजराणासाठी फळभाजी, मासे विक्रीसाठी टॅक्सीचा वापर
दाबोळीतील अधिकृत टॅक्सी व्यवसाय बंद झाल्याने या व्यावसायिकांना अर्थाजनाची कोणतेही साधन उपलब्ध नाही. संघटनेच्या सदस्यांत काही विधवा महिलांचाही समावेश आहे. कर्ज आणि अन्य समस्यामुळे काहींची आर्थिक स्थिती आधीच ढासळलेली होती. त्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोनामुळे गंभीर संकट कोसळलेले आहे. त्यातूनही काही तरी मार्ग काढण्यासाठी अनेक जण प्रयत्न करीत आहेत. परंतु सध्यस्थितीत कोणतीही संधी नाही. अन्य पर्याय नसल्याने आपल्या काही सदस्यांनी आपल्याच टॅक्सी वाहनांतून भाजी फळ, नारळ, मासे विक्री करणे सुरू केलेले आहे. दिवसाची आर्थिक गरज भागवण्यासाठी हा व्यवसाय टॅक्सींचाच वापर करून करण्यात येत असून शहर व परिसरात काही नाक्यांवर व रस्त्यांच्या बाजुला हा व्यवसाय करण्यात येत आही. आपण स्वता टॅक्सीमधून हा व्यवसाय सध्या करीत असून हा केवळ काडीचा आधार असल्याचे सुदेश नाईक यांनी सांगितले.