काय करावं सुचत नाही हो. पण काहीतरी चुकतंय एवढं नक्की.
काय झालं?
मॅडम, माझी मुलगी प्रिया आणि मुलगा पियुष परस्पर विरुद्ध टोकं. ती अगदीच भिडस्त आणि पियुष कमालीचा आक्रमक. मध्य कसा तो नाहीच. प्रियाच्या मैत्रिणी नुसता उपयोग करून घेतात तिचा. प्रिया हे कर, प्रिया ते कर. प्रोजेक्ट पूर्ण करून दे. असाईनमेंटसाठी मदत कर. अमुक ठिकाणी आमच्यासोबत चल. तिला नाही म्हणताच येत नाही. या सगळय़ामध्ये अभ्यास तसाच राहतो. मग टेन्शन आणि रडणं. आता तर म्हणते मला काहीच करावंसं वाटत नाही. सगळं नकोच वाटतंय. निराश झाल्यासारखीच वागते.
बरं, दोघं काय शिकत आहेत?
प्रिया तेरावीला आहे आणि हा फर्स्ट इयरला. हं.. पियुष आक्रमक आहे म्हणजे नेमकं काय करतो? मॅडम, एखादी वस्तू त्याला हवी असेल तर कसंही करून मिळवणार. परवाचीच गोष्ट सांगते, त्याला मोबाईल हवा होता. त्याने वडिलांकडे हट्ट धरला, मोबाईल हवाच. मी त्याला समजावून सांगितलं, घेऊया, पण थोडं थांब. हा ऐकायलाच तयार नाही. भयंकर चिडला, एकदम वेडवाकडं बोलायला लागला. त्याचे बाबा नाराज झाले आणि वैतागत ‘काय करायचं ते करू दे त्याला’ म्हणत मोबाईल आणून दिला.
गेलं वर्षभर हे असंच वागणं आहे. ऐकायचं नाहीच. या साऱयामधे माझी मोठ्ठी पंचाईत होते. प्रिया अगदी नेभळटासारखी करते. हा नुसता फक्त स्वतःकडेच पाहतो, नी स्वतःपुरतं जगल्यासारखा वागतो.
हा संवाद बराच वेळ सुरू होता. एकंदर घरातलं वातावरण, बाकीच्यांचे स्वभाव हे सारं जाणून घेतल्यानंतर नेमकी गल्लत कुठे, कशी झाली आहे, होते आहे हे लक्षात आले. नंतर बराच काळ प्रिया आणि पियुषचे समुपदेशन सत्र सुरू राहिले.
प्रिया आणि पियुषसारखी अनेक उदाहरणे आपल्या आसपास पहायला मिळतात. नकार देता न येणे वा ठामपणाच्या अभावामुळे असे वर्तन घडत असते. ठामपणा म्हणजे निश्चयी वर्तन (assertive behaviour). कोणत्याही बाबतीत जर ठाम राहता येत नसेल तर अशी गल्लत होऊ शकते. बऱयाचदा मग अशी दोन टोकंही पहायला मिळतात. लहानपणी आपण ज्या वातावरणात वाढतो, जे अनुभवतो तशी आपली जीवनलिपी तयार होत असते. स्वभावाचा आकृतिबंध आकार घेत असतो. अनेकदा भिडस्तपणा, संकोची स्वभाव, आक्रमकता या गोष्टींचे मूळ बालपणात सापडते. उदा. लहान मुले घरी सांगत येतात अमुक अमुक व्यक्ती मला असं बोलली. माझी चूक नव्हतीच. मला ते आवडले नाही. मी त्याला रोखठोक उत्तर दिले, वगैरे. आपण वा घरातली मोठी माणसे मुलांना बऱयाचदा त्यावर काय सांगतो? जाऊ दे. यापुढे तो काही बोलला तर सोडून दे. प्रतिक्रिया देऊ नको. अशांपासून जरा लांबच राहिलेले बरे. तसेच बऱयाच वेळा शाळेत, घरात, नातेवाईक, मित्रमंडळीमधे अनेकदा शांत, प्रत्येक सांगितलेली गोष्ट करणाऱया मुलांचे कौतुक होते. परंतु एखादी गोष्ट पटली नाही तर स्पष्ट बोलणारे वा स्वतंत्रपणे विचार करून मते मांडणाऱया मुलांकडे बऱयाचदा तो/ती हुशार आहे, पण जरा आगाऊच आहे अशी शेरेबाजी होते. अशा पद्धतीची चर्चा, शेरेबाजी जर मुलांच्या सतत कानावर पडू लागली तर मुलांमधे एकतर निष्क्रियता (passive behaviour) येते. ती अगदी संकोची, भिडस्त होतात नाहीतर त्यांच्यात आक्रमकता (aggressive behaviour) येते.
इथे एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की खंबीरतेच्या वा ठामपणाच्या एका बाजूला भिडस्तपणा, संकोचीपणा, प्रतिकारशून्यता वा निष्क्रियता असते तर दुसऱया बाजूला आक्रमकता! ही दोन्ही टोके घातक ठरू शकतात. निष्क्रिय अथवा आक्रमकतेपेक्षा मुले ठामपणाकडे कशी वळतील हे पाहणे हिताचे ठरते. कारण ही दोन्ही टोके व्यक्तिमत्त्व विकासाला खीळ बसवतात. व्यक्ती जर संकोची वा भिडस्त झाली तर कालांतराने स्वतःच्या गरजेचा विचार मनात येणेसुद्धा अपराधीपणाची भावना निर्माण करू शकते. ठामपणाच्या अभावामुळे नकार देणे, नीट व्यक्त होणे अवघड जाते, भिडस्तपणा असल्याने आपली मते, भावना योग्य प्रकारे व्यक्त केल्या जात नाहीत त्यामुळे अशा व्यक्ती गृहीत धरल्या जाऊ लागतात. त्या व्यक्तीचे स्वतःचे असे मत असेल असा विचारच कुणाकडून केला जात नाही. नंतर नंतर अशा व्यक्तींना जीवन नीरस, कंटाळवाणे वाटू लागते. I am not o k अशी त्यांची मनोवृत्ती होते. याउलट आक्रमकता असेल तर इतरांच्या भावना, गरजा लक्षात न घेता काहीही करून आपल्याला हवे ते साध्य करण्याकडे यांचा कल असतो. you are not ok अशी यांची मानसिकता असते.
आक्रमक किंवा भिडस्त वर्तनापेक्षा ठाम वा निश्चयपूर्वक वर्तन (assertive behaviour) अगदी वेगळे असते. ठामपणे वागणे, बोलणे असणाऱया व्यक्तींमध्ये आत्मविश्वास असतो. अशा व्यक्ती योग्य रीतीने आपल्या भावना, मते, विचार व्यक्त करतात. योग्य संवाद साधत आपल्याला जे म्हणायचे आहे ते दुसऱयांपर्यंत पोहचवत असतात. मनात कोणत्याही संदेहाची भावना नसते. मोकळेपणाने संवाद साधतात. इतरांचे योग्य ते कौतुक करतात, समोरच्याने केलेली प्रशंसाही मोकळेपणाने स्वीकारतात, टीकाही खुल्या मनाने स्वीकारतात. ठामपणा म्हणजे इतरांच्या हक्काची जाणीव ठेवून, आदर राखत निश्चयपूर्वक वागणे होय. निश्चयी वर्तन म्हणजे मनमानी वा आक्रमकता नव्हे, तर विधायकपणे स्वतःसाठी आणि स्वतःला व्यक्त करणे अभिप्रेत आहे. ठामपणा वा निश्चयी वर्तन असणाऱया व्यक्ती चटकन निराश होत नाहीत. केवळ नशिबावर हवाला ठेवून एखादी गोष्ट घडण्याची वाट न पाहता ती घडण्यासाठी काय करता येईल याचा विचार करून त्यादृष्टीने वाटचाल करतात. सकारात्मक कृतीवर अधिक लक्ष देतात.
ठामपणा अर्थात ऍसर्टिव्हनेस हा कृतिशीलतेचा महत्त्वाचा पैलू आहे. ठामपणे वागणे, बोलणे, कृती करणे हे कौशल्य आहे. आपल्याला खऱया अर्थाने प्रगती साधत उत्तम वाटचाल करायची असेल तर ठामपणाचे कौशल्य अंगीकारणे गरजेचे आहे. ठामपणाच्या अभावाने व्यक्ती ताण, राग, नैराश्य, भावनिक उदेक अशा नकारात्मक भावनांनी ग्रासली जाण्याची शक्मयता अधिक असते. दैनंदिन जीवनात, नातेसंबंधातही अनेकदा यामुळे अडथळे निर्माण होतात. त्यामुळे ठाम वा निश्चयपूर्वक वर्तनासाठी सुरुवातीपासूनच सजग राहणे गरजेचे आहे. व्यक्ती जेवढी ठाम असते तेवढी स्वतःची प्रत्येक गरज पूर्ण होईल या भ्रमात ती नसते त्यामुळे आक्रमकतेकडे वळण्याचीही शक्मयता खूप कमी राहते. तडजोड, चर्चा या गोष्टी ती आत्मसात करते. योग्य तऱहेने आपला मुद्दा मांडते. तिची मनोवृत्ती I am ok, you are ok अशी विधायक असते. परंतु त्यासाठी हे ठामपणाचे कौशल्य गरजेचे आहे. काहींमध्ये हे कौशल्य असते तर काहींमधे नसते. ज्यांच्यामधे हे कौशल्य नसते त्यांना जाणीवपूर्वक प्रयत्न करून ते आत्मसात करता येते. अर्थात या विषयाला बरेच पैलू आहेत. या विषयाची व्याप्ती मोठी असल्याने एकाच लेखात ते सर्व मांडणे अवघड आहे. ठामपणाचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी कोणत्या तंत्राचा अवलंब करता येईल, खंबीरतेकडे वळण्याच्या दृष्टीने कशा पद्धतीने वाटचाल करता येईल याविषयी पुढच्या लेखात….
Ad. सुमेधा देसाई, मो.94226 11583