प्रतिनिधी / सातारा :
भुयारी गटारच्या कामासाठी प्रभाग 17 मध्ये खोदाखोदी करण्यात आली आहे. ठेकेदार एस.ए.इन्फ्रा पुणे तर्फे इंजिनिअर अवनीश कुमार हे मार्च 2017 पासून काम करत आहेत. या कामामध्ये मनमानी सुरु असून चालढकल सुरू आहे. हे काम दि.10 पर्यंत पूर्ण करण्यात यावे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर आत्मदहन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवक विजयकुमार काटवटे यांनी निवेदनाद्वारे दिला.
या निवेदनात म्हटले आहे की, भुयारी गटाराचे काम शहरात पालिकेच्यावतीने मंजूर करण्यात आले आहे. एस.ए.इन्फ्रा पुणे तर्फे इंजिनिअर अवनीश कुमार हे मार्च 2017 पासून करत आहेत. हे काम दोन वर्षाच्या मुदतीत देण्यात आले होते. त्यांना दोन वेळा मुदतवाढ पालिकेमार्फत देण्यात आली आहे. असे असताना शेवटची मुदत दि. 31 मार्च 2021 रोजी दिली आहे. कोरोना विषाणूचा एका बाजूला प्रार्दुभाव वाढत असताना मागील दोन महिन्यात रस्त्यांची खुदाई करुन पाईपलाईन टाकून झालेली आहे. तसेच चेंबरचे काम झालेले आहे. पावसाळा जवळ आलेला आहे. रस्त्याच्या खुदाईमुळे रस्त्यावर प्रवास करणे शक्य होत नाही. रस्त्याची चाळण झालेली आहे. अनेकवेळा अनेक ठिकाणी अपघात होवून वादविवाद झालेले ओहत. तसेच खुदाईच्या कामामुळे रस्त्यावर प्रंचड प्रमाणात चिखलाचे प्रमाण वाढलेले आहे. चारवेळा तेथे फायर ब्रिगेडची गाडी, ट्रक, ॲम्ब्युलन्स व ट्रक्टर रस्त्यामधील चिखलात रुतून बसला होता. त्या गाडय़ा काढण्यात खूप मेहनत घ्यावी लागली. ॲम्ब्युलन्समध्ये कोविड रुग्ण होता. त्यामुळे या परिसरातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या ठिकाणी मनमानी कारभार करुन जाणीवपूर्वक राजकारण करुन हे काम करण्यास विलंब करण्यात येत आहे. त्याबाबत काम करण्यास पाठपुरावा केला असता संबंधित ठेकेदार हा अरेरावीची भाषा वापरुन काम करण्यास टाळाटाळ करत आहेत. हे हेतूपुरस्पर काम प्रलंबित ठेवत आहेत. पालिकेकडे वारंवार पाठपुरावा करुनही त्यांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यांच्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सातारा यांच्या निरीक्षणाखाली हे काम सुरु आहे. त्यांच्याकडे पाठपुरावा केला असता उडवाउडवीची उत्तरे दिली आहे. प्रभागातील रस्त्याचे खडीकरण व खडीकरण पावसाळा सुरु होण्याचे अगोदर सात दिवसाच्या आत काम पूर्ण करावे, अन्यथा आत्मदहन आंदोलन छेडू असा इशारा काटवटे यांनी दिला आहे.