ऑलिम्पिक मोहिमेला आजपासून प्रारंभ, नेमबाजी, कुस्ती, बॅडमिंटन, हॉकीत मुख्य आशाअपेक्षा, मनू भाकर, सौरभ चौधरी, इलावेनिलवर फोकस
वृत्तसंस्था /टोकियो
1900 मध्ये ऑलिम्पिक पदार्पण करणाऱया आणि त्यानंतर 116 वर्षात केवळ 28 पदके जिंकणारे भारतीय पथक आजपासून (शुक्रवार दि. 23) सुरु होणाऱया टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन साकारेल, अशी अपेक्षा समस्त भारतीय क्रीडा वर्तुळाला असणार आहे. डबल डिजिट (दहा व त्याहून अधिक) पदके जिंकणे हे भारतीय पथकाचे मुख्य लक्ष्य असेल. आजवरच्या ऑलिम्पिक चळवळीत भारताला अभिनव बिंद्राने 2008 मध्ये एकमेव वैयक्तिक सुवर्ण जिंकून दिले असून यंदा त्यात मोलाची भर टाकली जावी, अशीही अपेक्षा असेल. यंदाची ऑलिम्पिक प्रेक्षकांविना होत आहे.
भारतीय पथकात 120 ऍथलिट्स असून त्यात 68 पुरुष व 52 महिला क्रीडापटू समाविष्ट आहेत. यापूर्वी फक्त 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये एकदाच भारताला डबल डिजिटमध्ये पदके जिंकता आली आहेत. त्यात एकही सुवर्ण नव्हते. यंदा 15 नेमबाज शुटिंग रेंजमध्ये नशीब आजमावणार असून त्यातील बहुतांशी युवा आहेत आणि मागील 2 वर्षांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी उत्तम यश संपादन केले आहे. 19 वर्षीय मनू भाकर, 20 वर्षीय इलावेनिल, 18 वर्षीय दिव्यांश सिंग पनवर आणि 20 वर्षीय ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर यांचा यात प्राधान्याने समावेश होतो.
जम्बो शुटिंग पथक एका बाजूला आहे तर दुसऱया बाजूला वेटलिफ्टर मिराबाई चानू 49 किलोग्रॅम वजनगटात या खेळातील एकमेव अपेक्षास्थान असेल. 26 वर्षीय मिराबाईने रिओ ऑलिम्पिकमधील अपयशानंतर कठोर परिश्रमाच्या बळावर सातत्याने लक्षवेधी प्रदर्शन साकारले आहे. ती 2017 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन व 2018 मध्ये राष्ट्रकुल चॅम्पियन ठरली असून क्लीन आणि जर्कमध्ये तिच्या खात्यावर विश्वविक्रमही नोंद आहेत. सर्व काही अपेक्षेप्रमाणे होत गेले तर ती भारताला वेटलिफ्ंिटगमध्ये पहिलेवहिले पदक जिंकून देऊ शकेल.
तिरंदाजांकडूनही बऱयाच अपेक्षा
तिरंदाजांकडूनही यंदा बऱयाच अपेक्षा असणार आहेत. जागतिक मानांकन यादीतील अव्वल नेमबाज दीपिका कुमारी तिरंदाजी पथकाचे नेतृत्व करेल. 2012 लंडन ऑलिम्पिकमधील अपयशाची भरपाई ती येथे करेल, अशी अपेक्षा आहे. अतानू दास व दीपिका मिश्र गटात तगडे आव्हान उभे करणार असल्याने तेही भारतासाठी आशास्थान असेल.
मुष्टियुद्धात जागतिक क्रमवारीतील अव्वलमानांकित अमित पांघल (52 किलोग्रॅम), एमसी मेरी कोम (51 किलोग्रॅम), माजी आशियाई चॅम्पियन विकास कृष्णन (69 किलोग्रॅम) कितीही बलाढय़ व मजबूत प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करतील.
यंदा 7 मल्ल कुस्तीत नशीब आजमावणार असून यात बजरंग पुनिया (65 किलोग्रॅम) व विनेश फोगट यांच्याकडून भारताला मुख्य अपेक्षा असणार आहेत. मागील 3 वर्षात या दोघांनी भाग घेतलेल्या जवळपास प्रत्येक आंतरराष्ट्रीय स्पर्धेवर आपली छाप उमटवली आहे. रवि दहिया (57 किलोग्रॅम) व दीपक पुनिया (86 किलोग्रॅम) हे 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील रौप्यविजेते डार्क हॉर्स असणार आहेत. लागोपाठ आशियाई स्पर्धा जिंकणारा दहिया धडाकेबाज प्रदर्शन साकारु शकतो.
हॉकीत दोन्ही संघ बहरात
पुरुष व महिला या दोन्ही गटातील भारताचे हॉकी संघ अलीकडे उत्तम कामगिरी करत आले असून त्याचीच पुनरावृत्ती आता ऑलिम्पिकच्या सर्वोच्च व्यासपीठावर देखील अपेक्षित आहे. मनप्रीतच्या नेतृत्वाखाली पुरुष हॉकी संघ व रानी रामपालच्या नेतृत्वाखाली महिला हॉकी संघ दडपण हाताळण्यात यशस्वी ठरले तर निश्चितपणाने पोडियमवर पोहोचतील. भारताचे पुरुष गटातील शेवटचे सुवर्ण 1980 मधील असून यंदा संघाचा फॉर्म पाहता पदकाची अपेक्षा गैर ठरु नये.
टेबलटेनिसमध्ये अचंता शरथ कमल व मनिका बात्रा यांच्यावर भिस्त असेल तर ऍथलेटिक्समध्ये भालाफेकपटू नीरज चोप्रासमोर पीटी उषा, दिवंगत मिल्खा सिंग यांना हुलकावणी दिलेल्या पदकावर आपली मोहोर उमटवण्याचे आव्हान असेल. आपल्या दुसऱया ऑलिम्पिक पदकासाठी पीव्ही सिंधू सुसज्ज असून ही कामगिरी केल्यास ती भारताच्या सर्वकालीन सर्वोत्तम महान क्रीडापटूंच्या मांदियाळीत अभिमानाने दाखल होईल.
आपल्या चौथ्या ऑलिम्पिकमध्ये सानिया मिर्झा महिला दुहेरीत अंकिता रैनाच्या साथीने कोर्टवर उतरणार आहे. फेन्सिंगमध्ये (तलवारबाजी) भवानी देवी व इक्वेस्ट्रियनमध्ये (अश्वदौड) फौवाद मिर्झा यांच्या पात्रतेमुळे भारतीय संघ या क्रीडा प्रकारात ऑलिम्पिक पदार्पण नेंदवेल. साजन प्रकाश व श्रीहरी नटराज यांनी ए क्वॉलिफिकेशन मार्कसह ऑलिम्पिकमध्ये धडक मारली असून माना पटेलही येथे अव्वल कामगिरीसाठी प्रयत्नशील असेल.
सुमित नागल पहिल्या फेरीत डेनिस इस्टोमिनविरुद्ध लढणार
टोकियो : भारतीय टेनिसपटू सुमित नागल पुरुषांच्या टेनिस एकेरीत उझ्बेकिस्तानच्या डेनिस इस्टोमिनविरुद्ध लढणार आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमधून अनेक खेळाडूंनी माघार घेतल्यानंतर मागील आठवडय़ातच नागलच्या ऑलिम्पिक सहभागावर शिक्कामोर्तब झाले.
सुमित सध्या जागतिक मानांकन यादीत 60 व्या स्थानी असून पहिल्या फेरीत विजय मिळवल्यास दुसऱया फेरीत त्याची लढत रशियाच्या डॅनिल मेदव्हेदेव्हविरुद्ध होऊ शकते. पहिल्या फेरीत मेदव्हेदेव्हची लढत अलेक्झांडर बबलिकविरुद्ध होणार आहे. महिला दुहेरीत 6 वेळा ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवणारी सानिया मिर्झा व अंकिता रैना यांच्यासमोर युक्रेनच्या नादिया व ल्यूडमिला यांचे आव्हान असेल.
उद्घाटन सोहळय़ात भारताचे फक्त 30 ऍथलिट सहभागी होणार
टोकियो : आज (शुक्रवार दि. 23) होणाऱया उद्घाटन सोहळय़ात नेमबाजी, बॅडमिंटन, तिरंदाजी व हॉकीसह एकूण 7 क्रीडा प्रकारातील भारतीय ऍथलिट उद्घाटन सोहळय़ात सहभागी होणार नाहीत. फक्त 30 ऍथलिट या सोहळय़ात भारताचे प्रतिनिधीत्व करतील, असे एक दिवस आधी जाहीर केले गेले. सदर पथसंचलन जापनीज अल्फाबेटिकल ऑर्डरने होणार असून यात भारताचा 23 वा क्रमांक असणार आहे.
पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग हा एकमेव हॉकीपटू यात सहभागी असेल आणि तो ध्वजवाहकही असणार आहे. महिलांमधून एमसी मेरी कोम भारताची दुसरी ध्वजवाहक असेल. हॉकी (1), बॉक्ंिसग (8), टेबलटेनिस (4), रोईंग (2), जिम्नॅस्टिक्स (1), जलतरण (1), सेलिंग (4), फेन्सिंग (1), पदाधिकारी (6) भारतीय पथकात समाविष्ट असणार आहेत.
‘तिरंदाजी, ज्युडो, बॅडमिंटन, वेटलिफ्ंटग, टेनिस, हॉकी (पुरुष व महिला), नेमबाजी पथकातील ऍथलिट दि. 24 रोजी पहिला सामना असल्याने उद्घाटन सोहळय़ात सहभागी होणार नाहीत’, असे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा म्हणाले.
आयओएचे महासचिव राजीव मेहता यांनी उद्घाटन सोहळय़ातील भारताचे पथक 50 हून अधिक सदस्यांचे नसेल, असे यापूर्वीच म्हटले होते. प्रत्येक देशातील फक्त 6 पदाधिकाऱयांना सोहळय़ात प्रवेश असेल, असे आयोजकांनी दोनच दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे.
नेमबाजीत यंदाही अधिक अपेक्षा असतील. अन्य खेळांना कमी महत्त्व देण्याचे कारण नाही. अनेक इव्हेंट्समध्ये आपल्याकडे अव्वल दर्जाचे ऍथलिट मानांकनात अगदी पहिल्या स्थानावर देखील विराजमान आहेत. मात्र, नेमबाजीत अधिक पदके जिंकण्याची संधी असणार आहे.
2008 बीजिंग सुवर्णजेता अभिनव बिंद्रा
जागतिक मानांकन यादीत आपले अनेक ऑलिम्पियन पहिल्या तीनमध्ये आहेत. आपल्या अनेक खेळाडूंना सोपे ड्रॉ लाभले आहेत. पथकातील बहुतांशी ऍथलिट युवा आहेत. पदकांची अपेक्षा लादून मला खेळाडूंवर दडपण आणायचे नाही. पण, यंदा आपली कामगिरी आणखी सरस असेल, अशी अपेक्षा आहे.
-माजी भारतीय हॉकीपटू जगबिर सिंग
भारत किती पदके जिंकेल, याचे आडाखे मी बांधणार नाही. कारण, माझ्या अपेक्षेपेक्षा अधिक पदके आपण जिंकू, यावर माझा विश्वास आहे. सुवर्णपदके जिंकल्याने पदकतालिकेत आपले स्थान उंचावेल. पण, तिसऱया व चौथ्या स्थानातील क्रीडापटूंच्या कामगिरीत अगदी काही डेसिमलचा फरक असतो, हे उमजून घ्यावे लागेल.
-2012 लंडन ऑलिम्पिक कांस्यजेता गगन नारंग
यंदा टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपले 9 बॉक्सर्स आहेत. ऑलिम्पिकमधील आपल्यासाठी हा उच्चांक आहे. त्यामुळेच अधिक अपेक्षा आहेत. मेरी कोमचा अनुभव यावेळी सर्वाधिक महत्त्वाचा ठरेल. अपेक्षा अधिक ठेवल्या तरच अधिक यशही प्राप्त करता येईल.
-2008 बीजिंग कांस्यविजेता विजेंदर सिंग
खेळाडूने अल्पसंतुष्ट असू नये आणि अवास्तव अपेक्षाही ठेवू नयेत, हे जरी खरे असले तरी डबल डिजिटमध्ये पदके जिंकण्यासाठी आपल्याला यंदा सर्वोत्तम संधी असणार आहे. आपल्या खेळाडूंनी तंत्र-कौशल्यावर अधिक मेहनत घेतली असेल तर ही बाब निश्चितपणाने शक्य होईल.
-माजी हॉकी कर्णधार विरेन रस्किन्हा
शरथ व साथियन हे डार्क हॉर्सेस आहेत आणि ते फॉर्म कायम राखू शकले तर कितीही दिग्गज प्रतिस्पर्ध्याला पराभवाचे धक्के देऊ शकतात. शरथ-मनिका मिश्र दुहेरीत खेळतील. तेथे केवळ 16 संघ असल्याने पदक जिंकण्यासाठी उत्तम संधी असेल. पहिले दोन सामने जिंकल्यानंतर पदकाच्या आशाअपेक्षा उंचावतील.
-द्रोणाचार्य पुरस्कार जेते टेटे प्रशिक्षक संदीप गुप्ता