वृत्तसंस्था/ कोलकाता
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल काँगेस पक्षाच्या ध्येयधोरणांच्या विरोधात डावे आणि काँगेस यांच्या युतीने पुकारलेल्या पश्चिम बंगाल बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या बंदमुळे राज्यात काही ठिकाणी सर्वसामान्य जनतेचे व्यवहार ठप्प झाले होते. या दोन्ही पक्षांनी बीरभूम येथे मोर्चाही काढला होता. किरकोळ प्रकार वगळता बंद शांततेत पार पडला असे सांगण्यात आले.
तृणमूल काँगेसच्या राज्यात हिंसाचार वाढला आहे. विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात होत असून मुख्यमंत्री बॅनर्जी यांचे राज्यकारभाराकडे लक्ष नाही, असे अनेक आरोप करण्यात आले.
भाजप-तृणमूलचे संगनमत
पश्चिम बंगाल राज्याला राम विरूद्ध कालीमाता अशा वादात गुंतवून धर्माच्या नावावर समाजात फूट पाडण्यासंबंधी भाजप आणि तृणमूल काँगेस यांच्यात संगनमत झाले आहे, असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून करण्यात आला. काँगेसनेही ममता बॅनर्जी भाजपला रोखण्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप केला. राज्याच्या तीन जिल्हय़ांमध्ये बंदला बऱयापैकी पाठिंबा मिळाल्याचे दिसून आले. मात्र इतर जिल्हय़ांमध्ये यथायथाच असल्याचे स्पष्ट झाले, असे मत अनेक पत्रकारांनी नोंदविले आहे.