देशात रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ : 24 तासात 64,531 नवे बाधित : 1092 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात संक्रमितांची एकूण संख्या 27 लाख 67 हजार 273 वर पोहोचली आहे. याव्यतिरिक्त 52 हजार 889 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच बरे होणाऱया लोकांची संख्या 20 लाख 37 हजार 870 वर पोहोचली आहे. बुधवारपर्यंतच्या अखेरच्या चोवीस तासात देशात 64 हजार 531 नव्या रुग्णांची भर पडली असून 60 हजार 91 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. प्रथमच एका दिवसात 60 हजारहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतल्यामुळे दिलासा व्यक्त केला जात आहे. बाधित आणि डिस्चार्ज यांची संख्या वाढण्याबरोबरच मृतांचा दिवसभरातील आकडाही वाढला असून एका दिवसात 1 हजार 92 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
कोरोनाचा संपूर्ण जगभरात हाहाकार माजला आहे. भारताव्यतिरिक्त अमेरिका आणि ब्राझीलमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक लोक संक्रमित झाले आहेत. अमेरिकेत 1.71 लाख लोक मृत झाले असून ब्राझीलमध्येही लाखांहून अधिक बळी गेले आहेत. आतापर्यंत 2.21 कोटीहून अधिक लोक कोरोना महामारीने संक्रमित झाले आहेत, तर 7.9 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात अजूनही 6 लाख 76 हजार 514 सक्रिय रुग्ण असून 20 लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे.
दिवसभरात 8 लाख चाचण्या
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) नुसार, 18 ऑगस्टपर्यंत कोरोना विषाणूचे एकूण 3 कोटी 17 लाख 42 हजार 782 नमुने घेण्यात आले असून त्यापैकी 8 लाख 01 हजार 518 नमुन्यांची चाचणी अखेरच्या चोवीस तासात करण्यात आली आहे.
तरुणांमध्येही अधिक संसर्ग : डब्ल्यूएचओ
डब्ल्यूएचओने कोरोना विषाणूबद्दल नवीन माहिती दिली आहे. यानुसार 20 ते 40 वर्षे वयोगटातील लोकांनाही मोठय़ा प्रमाणात संसर्ग होत आहे. या वयोगटातील लोकांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने त्यांना संसर्ग झाल्याची जाणीव होत नसल्याचे नव्या तपासात उघड झाले आहे.
पश्चिम बंगालमध्ये बाधितांमध्ये वाढ
महाराष्ट्रात कोरोना विषाणूची 11 हजार 119 नवीन प्रकरणे आढळल्यानंतर संक्रमित लोकांची एकूण संख्या 6 लाख 15 हजार 477 वर पोहोचली आहे. तसेच 422 रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या वाढून 20 हजार 687 वर गेली आहे. बुधवारी पश्चिम बंगालमध्ये कोविड-19 ची 3 हजार 175 नवीन प्रकरणे आढळली. ही राज्यातील एका दिवसाची सर्वोच्च पातळी ठरली. राज्यात संक्रमित लोकांची संख्या वाढून 1 लाख 22 हजार 753 झाली आहे.
उत्तर प्रदेश विधानसभेचे 20 कर्मचारी संक्रमित
उत्तर प्रदेश विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी लखनौमध्ये विशेष आरोग्य शिबिराद्वारे सर्व आमदारांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापूर्वी विधानसभा कर्मचाऱयांचीही चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये 20 कर्मचारी संक्रमित असल्याचे आढळले. उद्यापासून सुरू होणाऱया विधानसभा अधिवेशनासाठी कोरोनामुळे बरेच नवीन नियम बनवण्यात आले आहेत. राज्यातील दोन मंत्र्यांचाही यापूर्वी मृत्यू झाल्याने नियम कडक करण्यात आले आहेत. विधानसभा कॅन्टीनमध्ये जेवणासाठी एकावेळी फक्त 10 लोकांनाच अनुमती दिलेली आहे. प्रेक्षक कक्षात पत्रकारांसह बाहेरील लोकांना परवानगी मिळणार नाही. मीडिया कव्हरेजसाठीही मर्यादित परवाने दिले जाणार आहेत.